ब्रिटिश आणि मोडी (आणि आजचे आपण !)

इंग्रज भारतात आले आणि विशेष काही न करता ते इकडचे राज्यकर्ते बनले हा एक लोकप्रिय मतप्रवाह आहे. ह्या मतप्रवाहाद्वारे दोन वाईट गोष्टी परावर्तित होतात.
Modi Lipi Language
Modi Lipi LanguageSakal
Summary

इंग्रज भारतात आले आणि विशेष काही न करता ते इकडचे राज्यकर्ते बनले हा एक लोकप्रिय मतप्रवाह आहे. ह्या मतप्रवाहाद्वारे दोन वाईट गोष्टी परावर्तित होतात.

इंग्रज भारतात आले आणि विशेष काही न करता ते इकडचे राज्यकर्ते बनले हा एक लोकप्रिय मतप्रवाह आहे. ह्या मतप्रवाहाद्वारे दोन वाईट गोष्टी परावर्तित होतात - एक म्हणजे आपण आपल्याच राज्यकर्त्यांना इंग्रजांपेक्षा दुय्यम दर्जाचे ठरवत असतो आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे इंग्रजांच्या जिज्ञासा, जिद्द, आणि चिकाटी ह्या वाखाणण्यासारख्या गुणांना आपण सरळ सरळ नजरेआड करत असतो.

आपल्या रंगाच्या - जातीच्या - धर्माच्या नसलेल्या इंग्रजांना भारतीय राजकारणात घुसणं इतकं सोपं होतं का ? रूढींच्या बंधनात असणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांना इंग्रजांसारख्या परकीयांशी जुळवून घेणे जरासेही अवघड गेले नाही का ? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच आहेत आणि ती म्हणजे या गोष्टी घडवून आणण्यासाठी इंग्रजांनी घेतलेली प्रशिक्षित मेहेनत - जिच्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.

लाचलुचपत, फंदफितुरी आदी हत्यारे इंग्रजांनी वापरलीच पण त्याबरोबर आणखीन एक हत्यार वापरले ते म्हणजे जिज्ञासा. ब्रिटिश लायब्ररीत मिळालेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या वहीचा हा फोटो आहे. ह्यात त्याने मोडी अक्षरे लिहिली आहेत. सोबत त्याचे इंग्रजीत उच्चार, इंग्रजी अर्थ, आणि इंग्रजीतून हिंदुस्थानी (हिंदी) प्रतिशब्द लिहिलेले आहेत. १००-१५० पानी वही संपूर्ण ह्या शब्दार्थांनी भरली आहे !

वास्तविक पहाता सगळे इंग्रज कंपनीचे पगारी नोकर होते. भारतात यायला त्यांना मजबूत भत्ते मिळत असत. ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या व्यापारात भरपूर नफा मिळत होता. पण तो अजून वाढावा (आणि त्याद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे बोनस वाढावेत ! ) म्हणून त्यांना आणखी प्रदेश हवा होता. ह्या एकाच ध्येयासाठी सगळ्या इंग्रज नोकरदार मंडळींनी जीव तोडून प्रयत्न केलेले आहेत आणि त्यात त्यांना यश आले!

आज आपल्याकडे बऱ्यापैकी सुबत्ता आहे. आपण बऱ्यापैकी स्थिर आहोत. हा लेख तुम्ही चांगल्यापैकी मोबाईलवर वा कॉम्प्युटरवर वाचताय म्हणजे असं नक्कीच म्हणता येईल. पण आयुष्यात स्थिर असणाऱ्या आपल्यापैकी किती लोकांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे? किंवा आयुष्यात काही ध्येय आहे ? नोकरी-लग्न-घर-मुलं हे ध्येय असू शकत नाही - ह्या स्वेच्छेने घेतलेल्या जबाबदाऱ्या आहेत आणि जर त्या घेतल्या असतील तर त्या पूर्ण केल्याच पाहिजेत - त्यातून सुटका नाही. पण मूळ प्रश्न रहातोच - ध्येयाचं काय?

कोणी काय करावं आणि काय करू नये हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबतीत सल्ला द्यायची माझी योग्यता नाही याची मला खात्री आहे. आपल्यापैकी अनेक जण आज वेगवेगळ्या देशांत वा प्रांतात रहात आहेत. आपण का नाही काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करत? का नाही त्या शिकलेल्या गोष्टी आपल्या मातृभाषेत मांडायचा प्रयत्न करत? फक्त इतिहास नको पण बाकीच्याही गोष्टी आहेत. तंत्रज्ञान - वेगवेगळे सामाजिक अनुभव - प्रथा - भूगोल - सणवार - हवामान - फुलेपाने - झाडे - अगणित विषय आहेत, ज्यांत आपण जिज्ञासा दाखवू शकतो आणि आपल्या समाजाला त्याचा फायदा होईल याप्रकारे त्यांची आपल्या भाषेत मांडणी करू शकतो. का मग आपण वेळ घालवतो राजकारणावर आणि जातीय गोष्टींवर ज्यांचा रचनात्मकदृष्ट्या काहीच उपयोग नाही? दोनशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी आपल्याला हा धडा दिलेला आहेच. आज जिज्ञासा व चिकाटी दाखवणारी पाश्चिमात्य वा पौर्वात्य मंडळी येऊन पुन्हा आपल्यावर संपूर्ण सत्ता गाजवायची वाट पहात आहोत का? वाट कशाला पहायची - असं व्हायला सुरुवात झालेली आहेच. फक्त डोळे उघडून आजूबाजूला पहा. दोन-अडीचशे वर्षांपूर्वी आपण आपापसात भांडून हीच चूक केली होती आणि आता पुन्हा तीच परिस्थिती आहे. यातून वेळेवर सुधारायला हवे, नाहीतर इतिहास चुकांची पुनरावृत्ती करणाऱ्यांना कधीच माफ करत नाही !

(सदराचे लेखक इतिहासाचे लंडनस्थित अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com