निर्मिती कृत्रिम प्रवाळांची (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

जगातल्या सगळ्याच महासागरांतल्या प्रवाळ आणि प्रवाळ खडकांचं (कोरल्स आणि कोरल रीफ्स) अस्तित्व पुढच्या ऐंशी वर्षांत जलद गतीनं नष्ट होईल, असा निष्कर्ष नुकताच समोर आला आहे. अतिशय संवेदनशील अशा या सागरी अधिवासांच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्रवाळ मंच (आर्टिफिशिअल कोरल रीफ्स) तयार करण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे. त्या संदर्भात विवेचन.

जगातल्या सगळ्याच महासागरांतल्या प्रवाळ आणि प्रवाळ खडकांचं (कोरल्स आणि कोरल रीफ्स) अस्तित्व पुढच्या ऐंशी वर्षांत जलद गतीनं नष्ट होईल, असा निष्कर्ष नुकताच समोर आला आहे. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या जागतिक महासागर विज्ञान परिषदेत शास्त्रज्ञानी हे संशोधन सादर केलं आहे. जागतिक तापमानवाढ आणि महासागरांच्या वाढत्या आम्लतेचा थेट परिणाम प्रवाळांच्या अधिवासावर होत असून, पुढच्या वीस वर्षांत सत्तर ते नव्वद टक्के प्रवाळांचं अधिवास नष्ट होण्याचा मोठा धोका संभवतो, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. अतिशय संवेदनशील अशा या सागरी अधिवासांच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्रवाळ मंच (आर्टिफिशिअल कोरल रीफ्स) तयार करण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.

प्रवाळ मंच (कोरल रीफ) तयार करणारे प्रवाळ (कोरल) हे एकत्रितपणे चुन्याचं संचयन करून विस्तृत वसाहती करणारे सागरी जीव आहेत. सध्याच्या युगातले प्रवाळ हे खंडीय मंच किवा समुद्रबुड जमिनीवर (कॉंटिनेंटल शेल्फ) आणि खोल समुद्रातल्या बेटांच्या अवतीभोवती वाढताना आढळतात. समुद्राच्या पाण्याचं 16 अंश ते 36 अंश सेल्सिअस इतकं तापमान, दर हजारी 25 ते 40 इतकी क्षारता, घट्ट आणि गुळगुळीत सागर तळ, पाण्याची सहज हालचाल आणि जोरदार भरती प्रवाह अशी परिस्थिती असणारे अपतट प्रदेश प्रवाळ वाढीला आदर्श प्रदेश असतात. गाळयुक्त प्रवाह किंवा गाळाचं संचयन प्रवाळांच्या वाढीला प्रतिकूल असते.

समुद्रात 20 मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात पोचू शकतो. त्यामुळे या खोलीपर्यंत प्रवाळांची चांगली वाढ होऊ शकते. जगात अनेक ठिकाणी साठ ते सत्तर मीटर खोलीवरही प्रवाळ आढळतात, मात्र त्यातले काही मृत असतात. मृत प्रवाळांच्या वसाहतीतच नवीन प्रवाळ जन्म घेतात आणि त्यामुळे प्रवाळ मंचांचा विस्तारही वाढतो.
उथळ सागरतळांवर आणि सागरी बेटांच्या किनाऱ्याजवळ तयार होणाऱ्या प्रवाळ खडकांना प्रवाळ भित्ती किंवा मंच असं म्हटलं जातं. सीमावर्ती (फ्रिंजिंग रीफ), रोधक (बॅरिअर रीफ) आणि कंकणाकृती (ऍटॉल) असे त्यांचे मुख्य प्रकार आहेत.
प्रवाळांच्या वाढीस आणि प्रवाळ खडकांच्या निर्मितीसाठी अतिशय अनुकूल अशी उष्ण कटिबंधीय परिस्थिती असूनही भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावर प्रवाळ हे खूप कमी ठिकाणी आणि विखुरलेल्या भागांतच आढळतात. वायव्येकडचं कच्छचं आखात, अति दक्षिणेकडचे तटीय प्रदेश, लक्षद्वीपचा समुद्र, मंगलोरच्या पश्‍चिमेला समुद्रात शंभर किलोमीटर अंतरावर गावेशनी इथं, पूर्व किनाऱ्यावर कुडालोरपासून पॉंडिचेरीपर्यंत मंडपम आणि रामेश्वरमच्या नैऋत्येस, मानारच्या आखातात आणि तुतिकोरीन पर्यंत किनाऱ्याजवळ, लहान मोठी प्रवाळ खडकांची बेटं विखुरलेली आढळतात.
भारताच्या किनाऱ्यावर प्रवाळांचे 340 प्रकार आढळतात. प्राचीन काळात भारताचे अपतट (ऑफशोअर) प्रदेश प्रवाळांनी आणि प्रवाळ खडकांनी समृद्ध होते. गेल्या काही दशकांत किनारी प्रदेशात होणारं तेलजन्य आणि प्रदूषित उत्सर्जन आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे आणि मासेमारीचं वाढतं प्रमाण आणि खारफुटीचं पुनर्प्रापण (रेक्‍लमेशन) यामुळे हे प्रमाण खूपच घटलं आहे. कच्छचं आखात, लक्षद्वीप समूहातली पिट्टी बेटं, मानारचं आखात, मालवण वेगुर्ले किनारपट्टी आणि अंदमान ही आज प्रवाळ प्रदेशांच्या संरक्षणाची नितांत गरज असलेली ठिकाणं आहेत.

भारताच्या किनाऱ्यावर नवीन प्रवाळ तयार होण्यासारखी परिस्थिती दिवसेंदिवस कठीणच होते आहे. किनाऱ्यावरचं वाढतं प्रदूषण आणि आपल्या सगळ्यांनाच समुद्राबद्दल वाटत असलेली अनास्था यामुळे जैवविविधतेनं समृद्ध असे हे प्रदेश नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

प्रवाळ आणि प्रवाळ बेटं ही पर्यावरण बदलांच्या दृष्टीनं खूपच संवेदनशील असतात. प्रवाळ बेटावरच्या पर्यावरणात अगदी थोडासाही बदल झाला, तरी बेटावरच्या प्रवाळांच्या संपूर्ण वसाहतीवर त्याचा दूरगामी आणि संहारक असा परिणाम होऊ शकतो. ऊर्जा निर्मिती केंद्रं जेव्हा किनाऱ्याजवळ निर्माण केली जातात, तेव्हा उष्ण पाण्याचं समुद्रात उत्सर्जन केलं जातं. उथळ सागरजलाच्या तापमानात जेव्हा अशी वाढ होते, तेव्हा 20 मीटर खोलीपर्यंतची प्रवाळ बेटं अक्षरशः नष्ट होतात.

महाराष्ट्र सरकारनं वर्ष 2015 मध्ये मालवणच्या किनाऱ्यावर कृत्रिम प्रवाळ मंच निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली होती. मात्र, अजूनही त्यांत फारशी प्रगती झालेली दिसत नाही. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर कुलाबा, रत्नागिरी, विजयदुर्ग आणि वेंगुर्ला या ठिकाणी समुद्रात प्रवाळ सापडत असले, तरी मालवणच्या किनाऱ्याजवळ ते विपुल प्रमाणात आढळून येतात. शिवाय मालवणजवळचे प्रवाळ हे कठीण आणि मंच किंवा भित्ती तयार करू शकणारे जीव आहेत. इथं प्रवाळांच्या 11 प्रजाती आणि सागरी प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या 367 प्रजाती आढळतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी आणि सागरी परिसंस्था ही भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावरच्या पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अशा अकरा सागरी अधिवास आणि परिसंस्थांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या या प्रवाळांची आज जागतिक तापमानवृद्धी आणि समुद्रपातळीची हालचाल या कारणांमुळे मोठी हानी होऊ लागली आहे. ती कमी करण्यासाठी आणि प्रवाळ परिसंस्था जास्त संपन्न करण्यासाठी अशा प्रकल्पांचा फायदा नक्कीच होईल यात शंका नाही.
कृत्रिम प्रवाळ मंच निर्माण करण्याच्या प्रकल्पाअंतर्गत इतर सागरी प्रदेशातून आणलेले मंचांचे तुकडे (रीफ ब्लॉक्‍स) मालवणच्या सागरतळावर आणले गेले, तर त्यातूनच नवीन प्रवाळ जन्माला येऊ लागतील. इतर जलचर त्याभोवती जमतील आणि प्रवाळांची संख्या वाढू लागेल. एक एकर क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात, दुसरीकडून आणलेल्या प्रवाळांच्या वाढीचा सतत अभ्यास करूनच पुढचा प्रकल्प राबवला जाईल अशी योजना सांगण्यात आली होती. त्यामुळे प्रवाळ मंचाची जीवविविधता नजीकच्या भविष्यात भरपूर वाढेल आणि विस्तृत मत्स्यक्षेत्रं आजूबाजूला तयार होतील आणि मासेमारी व्यवसायही वाढीस लागेल, असंही मत मांडण्यात आलं होतं.

यापूर्वी तमिळनाडूमध्ये मानारच्या आखातात कृत्रिम प्रवाळ मंच तयार करण्याचे प्रयोग करण्यात आले असून, ते यशस्वीही झालेत. त्या प्रयोगात मानारच्या आखातात आणलेले प्रवाळ जवळच्याच प्रदेशातून आणले गेले होते. अंदमान, निकोबार, लक्षद्वीपसारख्या दूरवरच्या भागातून आणले गेले नव्हते. मालवणलासुद्धा जवळच्या समुद्र तळावरूनच ते आणणं फायद्याचं ठरेल. दूरवरून प्रवाळ आणण्याच्या प्रक्रियेत प्रवाळांचा मृत्यू दर वाढतो. शिवाय दूरवरचे प्रवाळ ज्या सागरी पर्यावरणात वाढलेले असतात, तिथल्या पाण्याची क्षारता, गढूळपणा (टर्बिडिटी), सूर्यकिरण पाण्यात प्रवेश करण्याची खोली, लाटांची शक्ती इत्यादी गोष्टी स्थानविशिष्ट असतात. त्या घटकांशी तिथल्या प्रवाळांनी जुळवून घेतलेलं असतं. नवीन पर्यावरणात त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होईलच याची खात्री नसते.

कृत्रिम प्रवाळ मंच ही समुद्रतळावर तयार केलेली मानवनिर्मित संरचना (स्ट्रक्‍चर) असते. सामान्यपणे सागरतळाच्या सपाट आणि उंचवटे आणि खड्डे नसलेल्या भागात ती तयार केली जाते. टायर्स, रिग्स, बुडालेल्या जहाजाचे अवशेष याचाही असे मंच तयार करण्यासाठी उपयोग जगभरात केला गेल्याचं दिसतं. अशा गोष्टींच्या ओबडधोबड पृष्ठभागावर अल्गीसारख्या एकपेशीय वनस्पती, बर्नाकल्स, प्रवाळ, शिंपले यांची वाढ होते. यातून जे क्‍लिष्ट असं जाळं तयार होतं, त्यामुळे माशांची (फिश) पैदासही होऊ लागते.

कृत्रिम प्रवाळ मंच तयार करण्याची पद्धत हजारो वर्षं जुनी आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी ती वापरली गेली असल्याचे उल्लेख आढळतात. पर्शिअन लोकांनी सर्वप्रथम तैग्रिस नदीच्या मुखापाशी, सागरी चाच्यांना अटकाव करण्यासाठी कृत्रिम प्रवाळ भित्ती तयार केल्याचे उल्लेख आढळतात. मोठ्या प्रमाणावर मासे मिळावेत म्हणून जपानमध्ये सतराव्या शतकाच्या सुरुवातीला, दगड धोंडे आणि गाळाचा वापर करून अशा भित्ती तयार केल्या गेल्या. सन 1830 नंतर मात्र यासाठी लाकडाचे मोठमोठे ओंडके, गाड्या, युद्धकाळातली अवजारं याही गोष्टी वापरल्या गेल्या.
अशा तऱ्हेच्या गोष्टी समुद्रतळावर विशिष्ट खोलीवर ठेवल्या, तर त्याभोवती सागरी वनस्पती, मासे आणि प्रवाळ यांच्या वसाहती काही वर्षांतच तयार होतात. आजकाल काही ठिकाणी विद्युत रासायनिक संचयन प्रक्रिया करून प्रवाळ वाढवण्याचे प्रयोग अशा संरचनांभोवती केले जातात. त्यावर चुनखडकाचं स्फटिकीकरण केलं जातं. त्यामुळे या संरचनांभोवती प्रवाळ जीव सहजपणे चिकटतात आणि त्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागते.

जगभरातले कृत्रिम प्रवाळ मंच किंवा भित्ती प्रकल्पातून असं लक्षात आलं आहे, की हे मंच खूप जास्त जैववस्तुमान (बायोमास) तयार करत नाहीत. हे मंच आजूबाजूच्या पाण्यातल्या माशांना केवळ आकृष्ट करतात. त्यामुळे त्याभोवती मोठ्या संख्येनं मासे दिसू लागतात. यातून असा गैरसमज निर्माण होतो, की कृत्रिम प्रवाळ मंच भरपूर मासे निर्माण करायला मदत करतात; पण प्रत्यक्षात तसं नसतं.
कृत्रिम प्रवाळ मंचानजीक नैसर्गिक प्रवाळ मंच असले, तर त्यावरही प्रतिकूल परिणाम होतो, असं लक्षात आलं आहे. प्रवाळ मंचाच्या आकारानुसार, कोणत्या प्रजातीचे आणि किती मासे त्याकडे आकृष्ट होतील ते ठरतं. लहान आकाराच्या नैसर्गिक प्रवाळ मंचाकडे मासे कमी संख्येनं आकृष्ट होण्याचा धोकाही यात असतोच.
समुद्रात बुडालेली जहाजं, होड्या यांचा उपयोग करून प्रवाळ मंच बनवले, तर त्याभोवती एक नवीन आहार संरचना (ट्रॉफिक स्ट्रक्‍चर) तयार होऊ लागतं आणि आजूबाजूच्या नैसर्गिक प्रवाळ मंचाभोवतीची सागरी परिसंस्था बिघडू लागते. जवळपासचे अनेक सागरी जीव कृत्रिम प्रवाळ मंचाकडे आकृष्ट होऊन स्थलांतर करू लागतात. परिणामी सागरी जीवांचे अनेक नैसर्गिक अधिवास (हॅबिटॅट्‌स) बदलू लागतात.

एका संशोधनानुसार, कृत्रिम प्रवाळ मंचामुळे जवळपासच्या नैसर्गिक मंचांच्या ऱ्हासाची सुरुवात होऊ लागते आणि अनैसर्गिक अन्नसाखळी आणि आहार संरचनेला पोषक वातावरण तयार होऊ लागतं. टायरचे ढीग समुद्रतळावर टाकून, फ्लोरीडासारख्या भागात खूप मोठ्या प्रमाणात कृत्रिम प्रवाळ मंच निर्मितीचे प्रयोग केल्याचं आढळतं. असेच प्रयोग डीलावेर, मेक्‍सिको, जिब्राल्टर, दुबई, फिलिपिन्स इथंही करण्यात आले आहेत. मात्र, टायरसारख्या अनैसर्गिक गोष्टी वापरल्यामुळे समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण होतं आणि प्रवाळ वाढ खुंटते. त्यामुळे सागरी पर्यावरणाचा योग्य अभ्यास केल्याशिवाय असे प्रयोग करणं धोक्‍याचं ठरू शकतं.

भारतात पॉंडिचेरीच्या किनाऱ्याजवळ आणि केरळला कोवालम इथं 18 ते 20 मीटर खोलीवर सिमेंट, खडक, दगड-धोंडे, झाडं आणि लोखंडी सळया वापरून कृत्रिम प्रवाळ मंच निर्मिती केली गेली होतीच. मालवण किनाऱ्यावर हा प्रकल्प नेमका कशा पद्धतीनं राबवला जाणार आहे, त्याची सगळी माहिती आजही उपलब्ध नसली, तरी तो राबवताना जगभरातल्या अशा प्रयोगांचं फलित लक्षात घेणं गरजेचं आहे. समुद्रात ज्या ठिकाणी असे प्रकल्प नियोजित असतात, ती ठिकाणंही तिथले नैसर्गिक प्रवाळ आणि सागरी पर्यावरण यासाठी घातक ठरू नयेत याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतंच!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com