आध्यात्मिक प्रतीकांचं नटराजमंदिर

natraj-mandir
natraj-mandir

तामिळनाडू राज्यात अनेक अतिभव्य शिवालयं आहेत. त्यातली बहुतेक चोळ/चोल राजवंशाच्या काळात बांधली गेलेली आहेत. या चोळ राजांची एक भव्य निर्मिती म्हणजे श्रीशंकरांची नटराज या रूपात उपासना होणारं चिदंबरम् इथलं अप्रतिम शिवमंदिर. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात, चेन्नई-तंजावर मार्गावर चेन्नईपासून २४५ किलोमीटरवर हे मंदिर आहे. स्वतःचं वाहन असेल तर पुदुचेरीमार्गे चेन्नईहून चार-पाच तासांत चिदंबरम् इथं पोहोचता येतं. 

चिदंबरम् इथलं हे भव्य मंदिर चोळ राजवंशाचं राज्याभिषेकमंदिर होतं. इथले परंपरागत पुजारी पोधू दीक्षितार नावाचे वैदिक ब्राह्मण आहेत. अगदी आजही चिदंबरम् इथल्या या मंदिरात केवळ पोधू दीक्षितारच सेवा देऊ शकतात. 

दक्षिण भारतात श्रीशंकरांची पंचमहाभूतस्थळं आहेत, जिथं श्रीशंकरांची उपासना पंचमहातत्त्वांच्या स्वरूपात केली जाते. यांपैकी चिदंबरम् इथलं हे शिवमंदिर आकाशतत्त्‍वाचं प्रतीक आहे. थिरुवनाईकवलचं जंबुकेश्वर हे जलतत्त्वाचं प्रतीक, कांचीचं एकाम्रेश्वर हे पृथ्वीतत्त्वाचं प्रतीक, तिरुवन्नमलईचं अरुणाचलेश्वर हे अग्नितत्त्वाचं प्रतीक आणि आजच्या आंध्र प्रदेशातलं श्रीकालहस्ती हे शिवमंदिर वायुतत्त्वाचं प्रतीक आहे. 

दक्षिणेत प्रत्येक मंदिराचं स्थळपुराण असतं. ते मंदिर कसं अस्तित्वात आलं याची पौराणिक कथा या स्थळपुराणात असते. असं म्हणतात की या जागी थिलाई या वृक्षाचं खूप मोठं वन होतं. थिलाई म्हणजे खारफुटीचा एक प्रकार. अगदी आजही चिदंबरम् पासून जवळच पिचावरम् इथं खारफुटीचं खूप मोठं वन आहे. एकेकाळी या वनाची व्याप्ती पार चिदंबरम् पर्यंत पसरलेली असावी. या जंगलात काही तामसी साधू राहून तंत्रसाधना करत असत. जेव्हा भगवान शिव इथं भिक्षाटनाच्या निमित्तानं आले तेव्हा त्यांना तिथून पिटाळून लावण्यासाठी म्हणून या तामसी ऋषींनी जादू-टोण्यानं अनुक्रमे नाग, वाघ व अपस्मार नावाचा पुरुष निर्माण केला. श्रीशंकरांनी नाग गळ्यात धारण केला, वाघाचं चर्म कटिवस्त्र म्हणून धारण केलं व अज्ञानाचं आणि अविद्येचं प्रतीक असलेल्या अपस्मार पुरुषाच्या पाठीवर पाय देऊन भगवान शिवांनी नटराजस्वरूपात आनंदतांडव सुरू केलं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इथल्या विष्णुभक्तांना जसं नुसतं मंदिर किंवा कोविल म्हटलं की श्रीरंगम् आठवतं, तसंच शिवभक्तांसाठी मंदिर म्हणजे चिदंबरम् इथलं हे नटराजमंदिर! 

पल्लव, चोळ, पांड्य आणि पुढं विजयनगरचे सम्राट आणि मदुराईचे नायक या विविध राजवंशांनी या नटराजमंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला. तब्बल ४० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर गेली एक हजार वर्षं हे मंदिरसंकुल दिमाखात उभं आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे, एकाच संकुलात भगवान शिवांची नटराजस्वरूपात व भगवान विष्णूंची  गोविंदराज पेरुमल या स्वरूपात उपासना केली जाते.  

भारतातलं हे एकमेव असं शिवमंदिर आहे, जिथं गाभाऱ्यात भगवान शिवांची साकाररूपात नटराजाच्या मूर्तिस्वरूपात, साकार-निराकाररूपात स्फटिक शिवलिंगस्वरूपात आणि पूर्ण निराकाररूपात अवकाशस्वरूपात पूजा केली जाते. गर्भगृहात नटराजांच्या मूर्तीच्या बाजूला एक काळा पडदा आहे. तो पडदा म्हणजे मायेचं प्रतीक. नित्यपूजेच्या वेळी तो पडदा सरकवला जातो आणि भाविकांना दिसतो तो त्यामागचा अवकाश, जो एकाच वेळी रिकामाही आहे आणि भरलेलाही. त्या अवकाशात केवळ पाच बिल्वपत्रं दिसतात. हेच ते प्रसिद्ध चिदंबररहस्य! 

मंदिरसंकुलात प्रवेश करताना चारी दिशांना सातमजली उंच भव्य गोपुरं दिसतात. ही चारही गोपुरं वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या शतकात बांधलेली आहेत, तरीही सर्व गोपुरं तितकीच उंच आहेत आणि प्रत्येकावर तांब्याचे तेरा कलश आहेत. सध्या आपण ज्या पूर्वगोपुरातून मंदिरात प्रवेश करतो, त्या गोपुराच्या भिंतीवर भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा कोरलेल्या आहेत, ज्यांना ‘कारण’ असं नाव आहे. 

इथल्या मुख्य गाभाऱ्याला ‘कनकसभा’ असं नाव आहे, म्हणून इथं भगवान शिवांना ‘कनकसभापती’ असंही नाव आहे. कनकसभा किंवा चित्रांबलम या मंडपाचं  छत २१ हजार ६०० सुवर्णकौलांनी शाकारलेलं आहे. चोळ राजा परांतक यानं या मंदिराचं छत दहाव्या शतकात सोन्यानं मढवून घेतलं असे मंदिरातल्या शिलालेखात उल्लेख आहेत. परांतक स्वतःला ‘भगवान शिवांच्या चरणकमलांपाशी रुंजी घालणारा भृंग’ असं म्हणवून घेतो. 

ही २१ हजार ६०० कौलं म्हणजे योगशास्त्रानुसार, आपण दिवसातून जितक्या वेळा श्वास घेतो त्याचं प्रतीक आहेत. ही कौलं ७२ हजार सोनेरी खिळ्यांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. हे खिळे म्हणजे आपला श्वास किंवा प्राण ज्या ७२ हजार नाड्यांमधून वाहतो त्यांचं प्रतीक आहेत. मानवी शरीरात जसं हृदय किंचित डावीकडे असतं, तशी इथं श्रीनटराजांची मूर्ती किंचित डावीकडे आहे. एकूणच, हे मंदिर गूढ आध्यात्मिक प्रतीकांनी भरलेलं आहे. 

खुद्द भगवान शिवांचं नटराजस्वरूप हेच मुळात अखिल विश्वाच्या नियमबद्ध हालचालींचं लयबद्ध प्रतीक आहे. भगवान शंकर जेव्हा तांडवनृत्य करतात तेव्हा ते नृत्य त्यांच्या सृष्टी (निर्माण) स्थिती, संहार, तिरोभाव (विश्रांती) आणि शेवटी अनुग्रह (मोक्ष) या पंचक्रियांचं प्रतीक मानलं जातं. शिव डमरू वाजवतात तेव्हा सृष्टीचं सृजन होतं, त्यांची अभयमुद्रा हे स्थितीचं, हातातला अग्‍नी हे नाशाचं, सभोवतालचं प्रभामंडळ हे तिरोभावाचं व उचललेला पाय हे अनुग्रहाचं प्रतीक समजलं जातं, म्हणूनच अगदी स्वित्झर्लंडमधल्या भौतिकशास्त्रात प्रगत संशोधन करणाऱ्या अत्याधुनिक पार्टिकल लॅबमध्येदेखील नटराजाची भव्य मूर्ती विराजमान आहे. 

भाविक हिंदूंचा असा विश्वास आहे की, जिथं श्रीनटराजांचं हे नृत्य चालतं ते चिदंबरम् हा विश्व तोलणारा बिंदू आहे. 

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानं आपल्या सर्वांच्याच हृदयात एक चिदंबरम् असून, तिथं आत्मस्वरूपी नटराजाचं नृत्य सर्व काळ चाललेलं असतं असा अध्यात्मविचार आहे,’ असं मला तिथल्या दीक्षितार पुजाऱ्यानं सांगितलं. 
आपल्या अंतरातला हा दैवी नृत्याविष्कार समजून घ्यायला तरी चिदंबरम् इथं अवश्य जावं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com