अप्रतिम जलमंदिर 

गुजरातमधल्या पाटण या शहरातली ‘रानी की वाव’.
गुजरातमधल्या पाटण या शहरातली ‘रानी की वाव’.

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते रूढार्थानं मंदिर नाही, आणि तरीही मंदिरच आहे. प्राचीन भारतात नगरसंरचनेत पाण्याचं महत्त्व असाधारण होतं. पाण्याचे स्रोत शोधणं, ते जपणं, पावसाचं पाणी अडवण्यासाठी तलाव, पुष्करिणी, पायऱ्यापायऱ्यांच्या विहिरी म्हणजे बावडी बांधणं ही सर्व कामं भारतातले राजे-राण्या आवर्जून करायचे; किंबहुना नदीवर घाट बांधणं, मंदिरांपुढं पुष्करिणी बांधणं, तलाव खोदणं ही कामं मोठ्या पुण्याची मानली जायची. मृत्यूनंतर नाव मागं राहावं म्हणून हिंदू राजांनी आणि राण्यांनी, आपल्या मृत्यू पावलेल्या आप्तांच्या स्मरणार्थ मंदिरं, घाट आणि पाण्याचे तलाव बांधलेले आहेत. असे घाट आणि पावसाचं पाणी अडवून ठेवण्यासाठी विविध राजवंशांनी बांधलेल्या पुष्करिणी, तलाव आणि विहिरी भारतात आजही उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत जागोजागी दिसतात. त्यातल्या त्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गुजरात आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमधून तर अशा पायऱ्यापायऱ्यांच्या बावडी  खूप ठिकाणी दिसतात. 

या सर्व बावड्यांची राणी म्हणजे गुजरातमधल्या पाटण या शहरातली प्रसिद्ध अशी ‘रानी की वाव’. जमिनीच्या पोटात चक्क सात मजले खोल गेलेली ही विहीर म्हणजे या भागात प्रचलित असलेल्या मरू-गुर्जर स्थापत्यशैलीचा पूर्ण विकसित असा सुंदर नमुना आहे; किंबहुना ही वाव म्हणजे, उलटं ठेवलेलं एक विशाल असं सातमजली भव्य मंदिरच आहे म्हणा ना! ही ‘रानी की वाव’ स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून इतकी सुंदर आहे, की जून २०१४ मध्ये ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. सध्या भारतीय चलनात असलेल्या नव्या शंभर रुपयांच्या नोटेवरदेखील या वावेचं चित्र आहे. 

गुजरातची राजधानी अहमदाबादपासून सुमारे दीडशे किलोमीटरवर वसलेलं पाटण हे शहर एकेकाळी अन्हीलवाड या नावानं प्रसिद्ध होतं. गुजरातमधल्या चालुक्य वंशाच्या शाखेची पाटण ही राजधानी होती. गुजराती भाषेत चालुक्यचं सोळंकी होतं. सुमारे तीनशे वर्षं सोळंकी राजवंशानं पाटणमधून उत्तर गुजरातवर राज्य केलं. सोळंकी राजे शूर तर होतेच; पण रसिकही होते, कलेचे भोक्तेही होते. जैन आणि हिंदू या दोन्ही विचारसरणींच्या लोकांना सोळंकी राजांनी उदारहस्ते आश्रय दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्या काळात अनेक मंदिरं, पाणपोया, धर्मशाळा बांधल्या गेल्या.  पुढं तेराव्या शतकात दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यानं केलेल्या हल्ल्यात पाटण पूर्णपणे लुटून उद्ध्वस्त केलं गेलं. एकेकाळी अत्यंत संपन्न, समृद्ध असलेलं आन्हिलवाड कालांतरानं लोकांच्या पार विस्मृतीत गेलं. आज पाटणच्या त्या वैभवकाळाची आठवण करून देतात ते इथल्या एकेकाळच्या किल्ल्याचे अवशेष, काही मंदिरं आणि ‘रानी की वाव’!  पाणी हे भारतात कायमच पवित्र मानलं गेलेलं आहे. जिथं पाणी असतं तिथं जलदेवतेचा, अप्सरांचा वास असतो अशी श्रद्धा आपल्याकडे गावोगावी अजूनही आढळून येते. त्यामुळे जिथं पाण्याचा साठा असतो त्या विहिरींना मंदिरस्वरूप मानणं ओघानंच आलं. साहजिकच, अशा विहिरी खोदताना त्या मंदिरांप्रमाणे सजवणं सुरू झालं. यातूनच पाटणच्या ‘रानी की वाव’सारख्या अद्वितीय कलाकृती जन्माला आल्या. ‘रानी की वाव’ जेव्हा मी पहिल्यांदा बघितली तेव्हा माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ‘रानी की वाव’ विश्ववारसास्थळांमध्ये का आली ते पहिल्या दहा सेकंदांत पुरतंच समजतं, इतकी भव्य आणि नजर खिळवून टाकणारी वास्तू आहे ही. 

सोळंकी घराण्यातला पराक्रमी राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी राणी उदयमती हिनं आपल्या राजधानीच्या गावी, पाटणमध्ये ही सातमजली विहीर बांधायचं ठरवलं. यावरून राजाच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याच्या राणीच्या हातात केवढी सत्ता होती हे आपल्याला कळतं. या शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती पुढं राणी उदयमतीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानं, म्हणजे राजा कर्णदेवानं, पूर्ण केली. मात्र, राणी उदयमतीनं बांधायला काढलेली विहीर म्हणून या विहिरीचं नाव ‘रानी की वाव’ असं पडलं. इथले लोक अजूनही या बावेला ‘उदयमती की बाव’ असंच म्हणतात. 

अंदाजे ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल अशी ही सातमजली विहीर अकराव्या शतकात बांधून पूर्ण  झाली. तब्बल १० वर्षं ही विहीर बांधायचं काम सुरू होतं. राणीनं बांधलेल्या या विहिरीचा उल्लेख संस्कृत कवी मेरुंगसुरी यानं सन १३०४ मध्ये लिहिलेल्या ‘प्रबंधचिंतामणी’ या ग्रंथात आढळतो. मात्र, पुढं अल्लाउद्दीन खिलजीनं पूर्ण पाटण शहर बेचिराख केल्यानंतर या विहिरीचा वापर करणारे, झरे साफ ठेवणारे, पाण्याचा निचरा करणारे, विहिरीची साफसफाई करणारे कुणी लोक जवळपास राहिले नाहीत आणि विहीर गाळानं भरत गेली. पुढं जवळच्या नदीला पूर आला आणि ही संपूर्ण विहीर मातीखाली दबली गेली होती. तिचे काहीही अवशेष वरून दिसत नव्हते. इथल्या लोकांच्या स्मृतीत ही विहीर केवळ एक दंतकथा बनून राहिली होती. पुढं कालौघात मातीची धूप झाली आणि या विहिरीच्या वरच्या थरातली काही शिल्पं दिसू लागली. काही स्थानिक लोकांनी ती पळवलीदेखील. या वास्तूला खऱ्या अर्थानं परत चांगले दिवस आले ते अगदी अलीकडे, म्हणजे सन १९८० च्या दशकात. भारतीय पुरातत्त्व खात्यानं इथं उत्खनन करून, काळाच्या ओघात जमिनीत दडलेलं, हे शिल्पलेणं अथक् प्रयत्नांतून परत एकवार लोकांसमोर आणलं. 

जसजसे आपण या सातमजली विहिरीच्या पोटात जातो तसतसे आपण अधिकाधिक स्तिमित होत जातो. वरून खाली निमुळती होत जाणारी ही विहीर म्हणजे, उलटं बांधलेलं एक सातमजली भव्य मंदिरच आहे. खरं कोरीव काम तिसऱ्या मजल्यापासून सुरू होतं. पश्चिमेकडून प्रवेशमार्ग असलेल्या या विहिरीच्या दोन्ही बाजूंच्या, म्हणजे दक्षिण व उत्तर, भिंतींवर असंख्य मूर्ती आणि शिल्पं कोरलेली आहेत. अतिशय नाजूक कलाकुसर असलेल्या या मूर्ती किती पाहू आणि किती नको असं होऊन जातं. 

मंदिरस्थापत्यात गर्भगृह हा जसा मंदिराचा सर्वात मध्यवर्ती गाभा असतो, तसा इथं विहिरीचा पाणी असलेला सर्वात खालचा भाग आहे, जिथं भिंतीत शेषशायी श्रीविष्णूची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे. सध्या त्या भागात आपण जाऊ शकत नाही. एका चौकातून दुसरीकडे जायला मध्ये पूल आणि त्यावर ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांचे खांबसुद्धा बारीक कलाकुसरयुक्त असून यक्ष, कीर्तिमुखं, पूर्णकुंभ इत्यादी प्रतीकांची रेलचेल या खांबांवर दिसते. दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव-पार्वती, सप्तमातृका, सूरसुंदरी अशा अनेक देखण्या कोरीव मूर्ती ‘रानी की वाव’मध्ये पाहायला मिळतात. 

‘रानी की वाव’ ही फक्त पाणी भरण्याची विहीर नसून ते सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नयनाचं एक केंद्र होतं हे यावरून स्पष्ट होतं. पाणी भरायला येणारे लोक क्षणभर विसाव्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून धर्म आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार यामागं असावा. प्रजेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणं हे राजाचं कर्तव्यच आहे; पण त्याचबरोबर इतकी देखणी शिल्पसृष्टी निर्माण करून लोककल्याणाबरोबरच धर्मशिक्षण साधणं ही राणी उदयमतीची दीर्घ दृष्टी चकित करून जाते.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com