मंदिर स्थापत्यशैलीमागचा विचार...

Temple
Temple

एखादं जुनं हिंदुमंदिर बघताना आपल्यापैकी काही जणांना तरी प्रश्न पडत असेल की या मंदिराचं स्थापत्य असंच का आहे? या कोनाड्यात हीच मूर्ती का बसवली आहे? काही मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या दरवाजाच्या, म्हणजे द्वारशाखेच्या, दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना या नदीदेवतांच्या मूर्ती दिसतात, त्यांचं प्रयोजन काय? उत्तरेकडची बहुतेक सारी मंदिरं एका विशिष्ट पद्धतीनं का बांधलेली असतात? उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये काही गोष्टी सारख्या असल्या तरी नवशिक्या नजरेलाही दोन्हीकडच्या मंदिरांच्या स्थापत्यातला फरक एका नजरेत कळू शकतो, त्यामधले बारकावे समजत नसले तरी. या दोन्ही स्थापत्यशैली वेगळ्या का आहेत? हे प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी पडलेले असतीलच.

आजच्या लेखातून अशाच काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे, पुढच्या लेखांमध्ये जेव्हा मी वेगवेगळ्या पुरातन मंदिरांविषयी लिहीन तेव्हा मंदिर समजून घ्यायला या लेखातली माहिती उपयुक्त ठरेल. मंदिरस्थापत्य हे शास्त्र फार अभ्यासानंतर विकसित झालेलं शास्त्र आहे हे आपण कुठलंही प्राचीन मंदिर बघताना लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही मंदिरात असलेली कोणतीही मूर्ती, प्रतिमा, मंदिराचे वेगवेगळे भाग हे सगळं मंदिरनिर्मात्यांनी, त्यांच्या मनात आलं म्हणून, उगाचच घडवलेलं नाही. मंदिर म्हणजे देवाचं घर. मानवी जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या देव-देवतांचं प्रतीकरूपानं अथवा मूर्तींच्या रूपानं भाविकांना दर्शन घडवणारं मानवानंच निर्मिलेलं आलय म्हणजे मंदिर.

हिंदुमंदिराच्या वास्तूच्या प्रत्येक भागामागं हिंदू धर्मतत्त्वज्ञान तर आहेच; पण एक निश्चित अशी वैज्ञानिक बैठकसुद्धा आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा विचारही आहे आणि मंदिरात आलेल्या माणसाला कलास्वाद घेता आला पाहिजे अशी अपेक्षाही आहे. 

मुळात कुठलीही भारतीय कला  - मग ती गायन, वादन, नृत्य, चित्रकला, वस्त्रकला, शिल्पकला - अशी कुठलीही असो, ‘केवळ कलेसाठी कला’ हा भारतीय कलेचा उद्देश कधीच नव्हता. संत तुलसीदासांची एक प्रसिद्ध चौपाई आहे :
राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार।
तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर॥ 
म्हणजे, रामनाम हा देहा-मनाच्या उंबरठ्यावर ठेवलेला असा दीप आहे की ज्याचा प्रकाश शरीराच्या आतही पडतो आणि बाहेरही. 
भारतीय मंदिरस्थापत्यकलेचंही तसंच आहे, एखादं मंदिर बघताना, त्यावर कोरलेली अद्भुत शिल्पं समजून घेताना आपली दृष्टी तर दिपून जातेच; पण मंदिर भाविकाना एक आत्मिक समाधानही देतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘भारतीय कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रसनिष्पत्ती. ही रसनिष्पत्ती दोन्ही बाजूंनी असावी लागते, म्हणजे एखादी कलाकृती निर्माण करताना त्या कलाकाराला स्वतःला रसानुभूती व्हावी लागते आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे रसिकालाही त्याच रसाची अनुभूती व्हावी लागते तरच त्या कलाकृतीमागचं प्रयोजन सिद्ध होतं,’ असं भारतीय सौंदर्यशास्त्राचे थोर अभ्यासक आनंद कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्थापत्यशास्त्राचंही हेच वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कलेचा आस्वाद घेणं ही अत्यंत एकाग्र होऊन करायची क्रिया आहे, मग मंदिरस्थापत्य तरी त्याला अपवाद कसं असेल? पण या निरामय आस्वादासाठी रसिकाचं मन भाविक तर असलं पाहिजेच; पण त्याचबरोबर संस्कारितही असलं पाहिजे.

मंदिरस्थापत्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी किंवा काहीतरी शिकवण्यासाठी विचारपूर्वक घडवलेली असते. उदाहरणच द्यायचं झालं तर, मंदिराची जगती किंवा जोतं हे सहसा आजूबाजूच्या जमिनीच्या समतलापासून चांगलंच वर धरलं जातं. काही पायऱ्या चढूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. आपल्या मर्त्य जीवनाच्या पातळीपेक्षा देवाची पातळी वरची आणि म्हणूनच देवदर्शनाला जाताना आपणही स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढवून स्वतःला त्यायोग्य करावं हा त्यामागचा विचार. खजुराहोमधल्या लक्ष्मणमंदिराचं जोतं प्रचंड उंच आहे.

बऱ्याच मंदिरांमध्ये बाह्य भिंतीवर आकर्षक विभ्रम असणाऱ्या सुंदर स्त्रियांची शिल्पं असतात. त्यांना ‘सुरसुंदरी’ किंवा ‘शालभंजिका’ असं म्हटलं जातं. काही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर मैथुनशिल्पं असतात. ही सर्व शिल्पं म्हणजे मानवाच्या भौतिक आयुष्याचं प्रतीक आहेत. मानवी आयुष्यातले काम, लोभ आदी विकार हे अशा प्रतीकांच्या रूपानं मंदिराच्या बाहेरच्या भागावर दाखवले जातात. ते सर्व विकार बाहेर ठेवून भक्तानं ईश्वराच्या ठाई चित्त ठेवून मंदिरात प्रवेश करावा असा धर्मविचार यामागं होता, म्हणूनच गर्भगृहाच्या द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना गंगा-यमुना असतात. गंगा ही पावित्र्याचं प्रतीक आणि यमुना ही भक्तीचं. मनातले सर्व क्षुद्र विकार मंदिराबाहेर सोडून भक्तानं पवित्र मनानं देवाच्या दर्शनाला भक्तिपूर्वक यावं हेच जणू त्या गंगा-यमुना भक्तांना सांगत असतात.

प्राचीन हिंदुस्थापत्यशास्त्रानुसार, मंदिरशैलीचे ‘नागर’ म्हणजे साधारणतः उत्तर भारतीय आणि ‘द्राविड’ म्हणजे दक्षिण भारतीय असे दोन प्रकार मानले जातात. या दोहोंचा संगम असलेली ‘वेसर’ नावाची आणखी एक उपशैलीही दिसून येते. नागर शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहावर उंचच उंच शंकूसारखं निमुळतं होत जाणारं शिखर आणि शिखरावर बसवलेला गोल आवळ्याच्या आकारातला आमलक; किंबहुना आवळ्याच्या आकारात आहे म्हणूनच त्याला ‘आमलक’ असं नाव दिलेलं आहे. द्रविडशैलीच्या मंदिरांत शिखराच्या उंचीपेक्षा विस्ताराला जास्त महत्त्व आहे. द्रविडशैलीचं शिखर तळाला पसरत पिरॅमिडच्या आकाराचं असतं आणि अगदी वर आमलकाऐवजी एक मोठी शिळा बसवलेली असते, जिला ‘स्तूपी’ असं नाव आहे. द्रविडशैलीचं अजून एक मोठं आणि सहज लक्षात येण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे भव्य अनेकमजली गोपुर! हे गोपुर मंदिराच्या संपूर्ण प्राकाराभोवती मोठा तट बांधून प्रवेशद्वारावर बांधलेलं असतं. दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये मदुराई मीनाक्षीमंदिराची आणि श्रीरंगम्‌च्या रंगनाथमंदिराची गोपुरं जगप्रसिद्ध आहेत.

साधारणतः पूर्ण विकसित मंदिरस्थापत्यामध्ये मंदिराचे चार भाग असतात, मुख्य आराध्यदेवतेची प्रतिष्ठापना असलेलं गर्भगृह आणि त्यावरचं शिखर हे दोन्ही मिळून मंदिराचं विमान बनतं. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोहोंमधली चिंचोळी जागा. भाविकानं मुख्य मंडपात संगीत, नृत्य आदी कलांचा आस्वाद घेतल्यानंतर गर्भगृहाकडे वळताना या अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. मंडप म्हणजे गर्भगृहापुढं असलेलं मंदिराचं मुख्य दालन. हे बहुधा अनेक स्तंभांवर तोलून धरलेलं असतं आणि प्रदक्षिणापथ हा बहुधा जुन्या मंदिरांमध्ये मुख्य मंदिराच्या बाहेर असतो. मंदिरात दर्शनाला आलेल्या भक्तानं आधी मंदिराचं चोहोअंगानी बाह्य दर्शन घ्यावं, मंदिराचं प्रयोजन समजून घ्यावं आणि मगच आत प्रवेश करावा हा त्यामागचा विचार.

मंदिर म्हणजे दैवी शक्तीच्या प्रतीकरूपातल्या दर्शनाचं आणि उपासनेचं स्थान. हिंदू धर्मातल्या देव-देवता जितक्या विपुल आहेत तितकीच त्यांची मंदिरंही विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फक्त मंदिरं बघताना मंदिरस्थापत्याचे  बारकावे समजून घेतले तर आपलं देवदर्शन तर जास्त सुफल होईलच; पण सुसंस्कृत रसिक म्हणून आपण जास्त अनुभवसंपन्न होऊ यात दुमत नसावं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com