आधी कळस, मग पाया रे

राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत सातव्या शतकात वेरूळमध्ये काही हिंदू लेण्या कोरण्यात आल्या होत्या.
Kailaslen
Kailaslensakal

‘राउळी मंदिरी’ या सदरात आतापर्यंत आपण देशभरातली अनेक मंदिरं पाहिली; पण दीपावलीनंतरच्या या आठवड्यात आपण बघणार आहोत ते मंदिर म्हणजे भारतीय शिल्पकलेचा मुकुटमणी, महाराष्ट्राचा शिल्पगौरव, वेरूळचं एका अखंड पाषाणात कोरून काढलेलं कैलासलेणं. ‘गुंफा क्रमांक सोळा’ या गद्य नावानं कैलासलेण्याची कागदोपत्री नोंद असली तरी हे पूर्ण तीनमजली मंदिर आहे. ते एकाच महाकाय पाषाणखंडातून कोरून काढलेलं असल्यामुळे हे संपूर्ण मंदिर म्हणजे एकसंध असं अद्वितीय शिल्पदेखील आहे. वेरूळच्या लेण्यामध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू अशा तिन्ही भारतीय धर्मपंथांची लेणी आहेत; पण या सर्व लेण्यांच्या सुंदर हाराच्या मधोमध असलेलं कैलासलेणं हे त्या हारातलं रत्नजडित सुवर्णपदक आहे.

राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत सातव्या शतकात वेरूळमध्ये काही हिंदू लेण्या कोरण्यात आल्या होत्या. कदाचित त्याच वेळी या ठिकाणी शिवमंदिर कोरायचा बेत आखला गेलेला असेल; पण दंतिदुर्गाच्या मृत्यूनंतर त्याचा काका, कृष्ण पहिला हा गादीवर आला. हा राजा महापराक्रमी होता. त्याच्या कारकीर्दीत त्यानं बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव या दोन्ही राजघराण्यांना राष्ट्रकूटांचं मांडलिकत्व स्वीकारायला भाग पाडलं होतं. असं म्हणतात की, कृष्णराजा कांचीच्या स्वारीवर गेलेला असताना त्यानं आणि त्याच्या राणीनं, म्हणजे माणकावतीनं, तिथं पल्लवांनी पाचव्या शतकात बांधलेलं कैलासनाथाचं भव्य मंदिर पाहिलं आणि त्या मंदिरानं भारावून जाऊन, असंच भव्य मंदिर आपल्याही राज्यात बांधून घ्यावं असा त्यांनी संकल्प केला. कांचीच्या कैलासनाथमंदिराचाच आदर्श डोळ्यापुढं ठेवून चालुक्यांची राणी लोकमहादेवी हिनं बदामीजवळच्या पट्टडक्कल इथं आपल्या नवऱ्याच्या नावानं भव्य असं विरुपाक्षमंदिर उभारलं होतं. तिथं काम करणारे शिल्पकार तिनं खास कांचीहून बोलावलेले होते. कृष्णराजानं बहुतेक त्याच शिल्पकारांकडून वेरूळचं कैलासलेणं खोदून घेतलं असावं. कारण, कैलासलेण्याच्या शिल्पशैलीवर पल्लव व चालुक्य या शिल्पशैलींचा स्पष्ट प्रभाव आहे.

‘आधी कळस, मग पाया रे’ अशा स्वरूपात खोदण्यात आलेल्या या भव्य शैलमंदिराचा मूळ गाभारा राजा कृष्णराजाच्या कारकीर्दीत पूर्ण होऊन इथली प्राणप्रतिष्ठा झाली होती; पण त्यानंतरच्या राजांच्या काळातही या मंदिराचं काम सुरूच होतं. मुख्य मंदिराभोवतीच्या शिल्पमंडित ओवऱ्या, सरितामंदिर, लंकेश्वरलेणं, यज्ञशाळा, तसंच मातृकामंदिर हे भाग नंतर खोदण्यात आले.

राष्ट्रकूट राजांच्या अनेक पिढ्यांची धर्मभावना, दातृत्व आणि कलादृष्टी यातून कैलासनाथाचं हे सुंदर शैलमंदिर साकार झालं.

शिल्पकारांच्या अनेक पिढ्या या कामात खपल्या; पण इतकं भव्य-दिव्य काम करूनदेखील त्यांनी कुठंही आपली नावं या मंदिरात कोरून ठेवलेली नाहीत. ‘इदं न मम’ ही उदात्त धर्मभावना असल्याशिवाय असलं अलौकिक काम कुठल्याही माणसाच्या हातून घडणंच शक्य नाही.

शिखरापासून सुरुवात करून खालपर्यंतचे तीन मजले कोरत आणणं - तेही अधिष्ठान, नंदीमंडप, अंतराळ, रंगमंडप, गर्भगृह, प्रदक्षिणापथ, द्रविडशिखर या सर्व मंदिर वैशिष्ट्यांसकट - हे सोपं काम नव्हे. त्यासाठी निव्वळ कलादृष्टीच नव्हे तर मंदिरस्थापत्याची कल्पना, ज्या माध्यमामधून हे काम केलं जात होतं त्या माध्यमावरची- म्हणजे सह्याद्रीच्या ज्वालामुखीजन्य दगडावरची, पकड आणि पूर्ण झाल्यानंतर मंदिर कसं दिसणार आहे त्याचा काल्पनिक आराखडा या सर्व गोष्टी नितांत आवश्यक होत्या.

दगड हे माध्यम तसं अक्षमाशील! एक छोटी चूक जरी झाली तरी ती दुरुस्त करता येण्यासारखी नव्हे. त्यातही सह्याद्रीचा हा व्होल्कॅनिक अग्निजन्य खडक कोरायला सोपा नव्हे. तरीही आठव्या शतकात आपल्याकडे हे आव्हान स्वीकारणारे शिल्पकार होते आणि त्यांनी हे काम करून दाखवलं.

आधी डोंगराच्या उतरत्या कडेला इंग्लिश ‘यू’ या अक्षराच्या आकाराचा एक मोठा चर खणून गोपूर आणि मुख्य मंदिरासाठी आवश्यक तेवढा मोठा पाषाणखंड मुख्य डोंगरापासून विलग केला गेला. हा चर थोडाथोडका नव्हे तर, तीस मीटर रुंद आणि तितकाच खोल होता. असं म्हटलं जातं की, हा चर खोदताना जवळजवळ २५०,००० टन दगड-माती खोदून काढावी लागली. त्या एवढ्या मातीचं काय झालं असेल हे आजही पुरातत्त्वज्ञांना न उलगडलेलं कोडं आहे. चर खोदून झाल्यानंतर मधोमध असलेल्या ६० मीटर लांब व ३० मीटर रुंद अशा महाकाय दगडातून मुख्य कैलासनाथमंदिराची इमारत कोरली गेली. चौकोनी गाभारा, वर द्रविडपद्धतीचे शिकार, आत प्रचंड मोठं शिवलिंग, गाभाऱ्याच्या बाहेर उघडा प्रदक्षिणापथ आणि त्याला लागून पंचायतनाची पाच छोटी मंदिरं, गाभाऱ्याबाहेर विस्तीर्ण रंगमंडप, त्या रंगमंडपाला तोलून धरणारे घटपल्लवयुक्त चौकोनी खांब व सभामंडपासमोर थोड्या अंतरावर असलेला नंदीमंडप व दोन्ही मंडपांना जोडण्यासाठी खोदलेला दगडाचाच पूल ही कैलासनाथ शिल्पमंदिराची वैशिष्ट्यं. मंदिराच्या वास्तूचा सबंध तळमजला हा भरीव प्रस्तरखंड आहे. मंदिराचं अधिष्ठान किंवा जगती चांगली पुरुषभर उंच आहे. ती जगती तोलून धरण्यासाठी शौर्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणून हत्ती, सिंह आणि व्याळ यांच्या प्रचंड मूर्ती खोदलेल्या आहेत. मंदिरातले स्तंभ, देवकोष्ठे, छपरं, विमान व शिखर या सर्वांवर पल्लव शिल्पशैलीची छाप आहे.

कैलासनाथमंदिराची ही मूळ वास्तूच इतकी देखणी, प्रमाणबद्ध आणि भव्य आहे की, मंदिराच्या बाह्य भिंतीवर एकही शिल्प कोरलेलं नसतं तरी या मंदिराच्या भव्यतेनं आपण दिपूनच गेलो असतो; पण आपले पूर्वज कलेच्या बाबतीत इतके अल्पसंतुष्ट नव्हते म्हणून त्यांनी मुळातच सुंदर असलेल्या मंदिराला उत्कृष्ट शिल्पकलेचा साज चढवलेला आहे.

कांचीच्या कैलासनाथमंदिराच्या भिंतीवर श्रीशिवशंकरांच्या मूर्तींचे जितके म्हणून विविध शिल्पाविष्कार कोरलेले आहेत, त्यांपैकी बहुतेक आपल्याला वेरूळच्या कैलासनाथ मंदिरातही आढळतात. पार्वतीशी विवाह करणारा कल्याणसुंदर शिव, मार्कंडेयाला यमपाशातून सोडवणारी मार्कंडेयानुग्रह मूर्ती, रावणाचं गर्वहरण करणारे शिव, कार्तिकेयासहित सोमस्कंदशिवमूर्ती, तांडव करणारी तांडवमूर्ती, अंधकासुराचा वध करणारे रौद्र शिव, त्रिपुरान्तकशिवमूर्ती वगैरे ‘शिवागम’ या ग्रंथांत वर्णिलेले शिवमूर्तींचे सर्व प्रकार या मंदिरात कोरलेले आहेत.

वेरूळचं हे कैलासलेणं माझं अत्यंत आवडतं. मी जवळजवळ पंधरा वेळा कैलासाचं दर्शन घेऊन आलेय. तरीही प्रत्येक वेळी वेरूळहून परत आल्यानंतर काही दिवस मला काहीच सुचत नाही. जे बघितलं, जे अनुभवलं ते कितीही प्रयत्न केला तरी शब्दांत उतरवता येत नाही. जिवाची खूप तडफड तडफड होते. स्वतःची तुटपुंजी शब्दसंपदा आणखीच दरिद्री, कळाहीन वाटायला लागते. तिथल्या कलाकारांच्या छिन्नी-हातोड्याच्या एकेक घावागणिक जीव ओवाळून टाकावा इतकं त्यांचं थोर कसब. एका प्रचंड प्रस्तरातून कोरून काढलेलं तीनमजली मंदिर, गर्भगृह, प्रदक्षिणापथ, दोन दोन सभा मंडप, दोन उत्तुंग विजयस्तंभ, दोन्ही बाजूंना असलेल्या दीर्घिका, प्रत्येक भिंतीवर कोरलेली अप्रतिम शिल्पं...किती किती आणि काय काय बघायचं? घरी परत आले तरी डोळ्यांसमोर दिसतात ती कैलासलेण्यांमधली शिल्पं; हाडा-मांसाची माणसं नव्हे. विख्यात मूर्तितज्ज्ञ आणि भारतीय स्थापत्यशास्त्रातील गुरू डॉ. गो. बं. देगलूरकरांच्या शब्दात सांगायचं तर, नुसते ‘शिल्पबंबाळ’ होऊन परततो आपण!

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com