

Shiv Sena Split and Political Crisis
esakal
बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याने बंड केल्यावर भाजप त्यांच्या मागे उभा राहिला. शिंदेंनी मूळ शिवसेना पार खिळखिळी करून टाकली आहे. आता भाजपसारख्या बलाढ्य पक्षाबरोबर दोन हात करणे शिवसेनेला चांगलेच कठीण जात आहे. ज्या मुंबईवर वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता होती, तिथेही काही राहिले नाही. त्यामुळे पक्षाला मरगळ येणे स्वाभाविक आहे. मात्र, या फुटीमागे पक्षांतर्गत संघर्षाबरोबरच केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘लार्जर गोल’ही कारणीभूत आहे. शिवसेनेतील ‘ओम
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी मुंबईत झाली. ‘मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना’ ही त्यांची घोषणा होती. प्रारंभी संघटनेने परप्रांतीयांच्या विरोधात, विशेषतः दाक्षिणात्यांच्या विरोधात आवाज उठविला. ‘बजाओ पुंगी, हटाओ लुंगी’ असा नारा देऊन दाक्षिणात्यांना लक्ष्य केले. प्रारंभी संघटनेचे कार्यक्षेत्र मुंबई आणि ठाण्यापुरते मर्यादित होते. मुंबईतील मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे, कामगारांवर अन्याय होणार नाही, याचा विचार करून ‘भारतीय कामगार सेनेची’ स्थापना केली. पुढे या संघटनेने आपला विस्तार मोठ्या प्रमाणात वाढविला. स्थानिक लोकाधिकार समिती, विद्यार्थी सेना, महिला आघाडी, श्रमिक सेना यांचीही स्थापना झाली. राजकारणाबरोबरच समाजकारण करण्यास सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो.
पुढे संघटनेचा पक्ष बनल्यानंतर मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत वातावरण ढवळून काढले. हिंदुत्वाच्या एकाच मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेची २५ वर्षांहून अधिक काळ युती टिकली. शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते, की बाळासाहेब ठाकरे यांची पक्षावर मजबूत पकड होती. त्यांच्या शिलेदारांमध्ये दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, छगन भुजबळ यांचा समावेश होता. बाळासाहेबांच्या बरोबरीने या नेत्यांनी पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.
मुंबई, ठाण्यासारख्या महापालिका जिंकल्या. पुढे आमदार, खासदार निवडून आणले. १९९५मध्ये भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता आणली. शिवसेनेचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे (एकत्रित शिवसेनेचे) हे होते. एकनाथ शिंदे (ठाकरेंना सोडून) मुख्यमंत्री बनले. तसेच, मनोहर जोशी लोकसभेचे सभापतीही होते. काही मंडळी केंद्रात मंत्रीही बनली. शिवसेना ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष होता. सर्वसाधारणपणे हा या पक्षाचा इतिहास आहे.