

Bharat International Water Week 2026
esakal
मिलिंद उमरे
भामरागडसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील जिंजगावगावाचे नाव आज राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. या गावातील जलयोद्धा सीताराम मडावी यांची दिल्ली येथे आयोजित नवव्या ‘भारत आंतरराष्ट्रीय जलसप्ताह - २०२६’ कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. या कार्यशाळेत ते थेट भारताच्या उपराष्ट्रपतींसमोर आपल्या कामाचा अनुभव मांडणार आहेत. भविष्यातील युद्धे पाण्यासाठीच होतील असे सांगणाऱ्या व जिंजगावला जलसमृद्ध बनवण्यासाठी आयुष्य वेचलेल्या मडावी यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
प्रश्न : सर्वप्रथम अभिनंदन! दिल्लीतील कार्यशाळेसाठी निवड झाल्याबद्दल काय भावना आहेत?
सीताराम मडावी : मनापासून आनंद झाला आहे. जिंजगावसारख्या दुर्गम गावातील माझ्या छोट्याशा कामाची दखल घेतली गेली, याचेच समाधान आहे. याचे श्रेय मी माझ्या गावकऱ्यांना आणि लोकबिरादरी प्रकल्पाला देतो. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी माझे नाव सुचवले. सुरुवातीला ५ जणांची निवड झाली होती, आता अंतिम दोन जणात मी आहे. माझ्यासोबत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील राम कुमारी यांचीही निवड झाली आहे.
हा जलव्यवस्थापन प्रवास नेमका कधी सुरू झाला?
- मला मनापासून वाटायचे, की आपण पाणी वाचवले पाहिजे. मी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची पुस्तके वाचली. त्यांनी आपले गाव कसे समृद्ध केले, हे वाचून मला प्रेरणा मिळाली आणि मीही माझे गाव समृद्ध करण्याचा निर्धार केला.