corruption
Esakal
सारिका चाटुफळे-कुलकर्णी - saptrang@esakal.com
एका राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात राजा नावाचा अधिकारी काम करत असे. मंत्रालयात असणाऱ्या तमाम अधिकाऱ्यांना जसा शांततेत काम करण्याचा, प्रत्येक काम नीट होईपर्यंत वर्षानुवर्षे करत राहण्याचा जो ध्यास असतो तसा या अधिकाऱ्यालादेखील होता. कुठलेही काम घाईघाईत, गोंधळात करून त्यात ढीगभर चुका करणे त्यांना आवडतच नसे. ‘अति घाई संकटात नेई’ हे वचनच मुळी त्यांनी त्यांच्या कार्यालयात लावून ठेवलेले होते. नवीन रस्ते, पूल, शासकीय इमारतींचे बांधकाम, विद्यमान मालमत्तांची दुरुस्ती अशी कित्येक कामे त्यांच्या अखत्यारीत होती. पण राजा साहेबांना हे काम अतिशय जोखमीचे वाटत असल्याने वर्ष वर्ष ते प्रत्येक अर्जाचा नीट अभ्यास करत असत. अधेमधे कधीतरी मग ही कामे पुढे सरकवण्यासाठी त्यांना अजून अभ्यास करावा लागे. त्या अभ्यासासाठी अर्जदार त्यांना पैसे देत असत. लोक त्याला लाच म्हणत असत. पण राजा साहेबांनी तसे कधीही मानले नाही. आपण या अर्जांचा, प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी हे पैसे घेत आहोत, यावर साहेबांचा ठाम विश्वास होता.