
दिलीप कुंभोजकर - kumbhojkar.dilip@gmail.com
सुरेश भट हे नाव घेतले की सहज आठवतात ती ही गाणी...
‘‘तरूण आहे रात्र अजुनी...’’ ‘‘ केंव्हातरी पहाटे उलटून रात गेली...’’ ‘‘ मलमली तारूण्य माझे...तू पहाटे पांघरावे...’’
‘‘मेंदीच्या पानावर...’’ ‘‘उषःकाल होता होता...’’ ‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! ’’
सुरेश भट हे नुसते एक सुप्रसिद्ध कवी होते असे नाही तर ते मराठी भाषेत ‘गझल’ हा काव्यप्रकार रुजविणारे ''शायर'' होते. खऱ्या अर्थाने ते मराठीतील ''गझल सम्राट'' आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवर मर्यादा होत्या पण त्यांची काव्य प्रतिभा सर्व मर्यादा ओलांडून मराठी सारस्वताची पूजा बांधायची. त्यांनी प्रेमगीत लिहीली, स्फूर्तीगीत लिहीली पण ते लोकप्रिय झाले ते ‘गझल’मुळे. सुरेश भट यांच्या कवितांची एक वही पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हाती पडली, त्यांनी सुरेश भट यांना त्वरित संपर्क साधला आणि मग एक एक कविता लतादीदी आणि आशाताई यांच्या आवाजात मराठी मनावर राज्य करू लागल्या आणि सुरेश भट हे महाराष्ट्राचे लाडके कवी बनले.