
Hindi cinema
esakal
भारतीय सिनेमाच्या ५४-५५ या वर्षातल्या पुस्तकात एकेक पान म्हणजे अलीबाबाची गुहाच. ‘चोर बाजार’, ‘हूर-ए-अरब’, ‘आब-ए-हयात’, ‘सरदार’, ‘यास्मिन’सारखे चित्रपट अरबी सुरसकथेइतकेच रंजक आणि अरबी-इराणी संगीताच्या जादूमध्ये हरवून टाकणारे... बिमल रॉय जसे ‘देवदास’चे स्वप्न पूर्ण करीत होते. तसंच या सुमारास के. आसिफ नावाचा एक तरुण मोगल दरबार पडद्यावर आणण्याचं स्वप्न पाहत होता. मनोरंजक, पोशाखी सिनेमाचा लोकप्रिय मसाला ‘आझाद’मध्ये ठासून भरला होता. यात ‘श्री ४२०’ दोन पावलं पुढे असला तरी ‘राधा ना बोले ना बोले रे’नं वेड लावलं होतं.
स्वप्न वास्तवाच्या हिंदोळ्यावर झुलणारा हिंदी सिनेमा आणि त्याचे चाहते रसिक प्रेक्षक यांची कहाणी आता जणू एका उत्कंठावर्धक वळणावर आली होती. अखंड भारतातील पंजाब-सिंधमधल्या लहानशा गावात जन्मलेले, लाहोरला शिकलेले, हॉलीवूडचे सिनेमे पाहून आपणही सिनेमात काम करावं म्हणून घर सोडून बाहेर पडलेल्या माणसांची एक स्वतंत्र कथा भारतीय हिंदी सिनेमाच्या इतिहासात आहे. अशीच एक कहाणी के. अमरनाथ यांचीही आहे. अमरनाथ गेलाराम खेतरपाल हे पंजाबातल्या मियाँवाली गावातून लाहोरमार्गे मुंबईत आले. तीसच्या दशकात दाखल झाले आणि लहान-मोठी कामं करून स्वतःची संस्था स्थापन केली. आपल्या पंजाबातील विस्थापित बांधवांना आपल्या चित्रपटात सामावून घेतलं.