Billu Makad election story
esakal
Billu Makad election story : बिल्लू माकडाची राजकीय खेळी: दोन बोक्यांच्या वादातून निवडणूक प्रचार
सारिका चाटुफळे-कुलकर्णी
एका गावात सगळे सुखाने राहात असत. या वाक्यावरून हे लक्षातच येते की ही आजच्या काळातील गोष्ट नसावी. आजच्या काळात कुठल्याच गावात कोणीच फार सुखी नसते. त्या गावात एके दिवशी एक ‘माऊडा’ नावाचा बोका जमातीतील नागरिक राजाकडे काहीतरी मागणी करण्यासाठी निघाला होता. राजा म्हणजे त्याला दैवत वाटत असे. राजाकडे गेल्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील असा त्याचा पक्का समज होता. परंपरेने चालत आलेल्या सगळ्या गोष्टी त्याला बरोबर वाटत असत. आपल्या देशात पूर्वापार काळापासून जे काही चालत आलेले आहे ते खूपच उदात्त आहे, यावर माऊडाचा ठाम विश्वास होता. माऊडा रस्त्याने मजेमजेत चाललेला असताना त्याला ‘किट्टू’ नावाचा मित्र बोका भेटला.
किट्टूने माऊडाला कुठे चालला आहेस, ते विचारले. आपण आपल्या अडचणी राजाला सांगण्यासाठी आणि राजाश्रय मिळवण्यासाठी चाललेलो आहोत, असे माऊडाने त्याला सांगितले. हे ऐकून किट्टू चिडला. तो माऊडाला म्हणाला, ‘‘तू अडाणी ते अडाणीच राहणार. अरे हे राजे लोक आपल्याला काहीही देत नसतात. उलट आपल्याकडूनच पैसे घेऊन ते स्वतःचे राज्य चालवतात. संस्कार, परंपरा वगैरे सगळ्या कालबाह्य गोष्टी आहेत. आपणच आपले राजे आहोत. आपणच सत्ता आपल्या हातात घ्यायला हवी.’’

