

भारतीय समाजरचनेत विविध धर्म, संप्रदाय आढळतात. प्रत्येक धर्माची वैशिष्ट्यं, विचारसरणी वेगवेगळी असली तरी सांस्कृतिक मूल्ये प्रत्येक धर्मानं जपलेली आहेत. जैन धर्म हा त्यांपैकीच एक. या धर्मानं भारतीय कला आणि स्थापत्यशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. ‘धर्मपरिवार’ या संकल्पनेची धर्मवैशिष्ट्यं त्यांच्या कलेत दिसून येतात.
सर्वसाधारणपणे भारतीय जैनकला ही बौद्ध आणि हिंदू कलेच्या समकालीन शैलीशी मिळतीजुळती आहे; परंतु ती बहुतकरून मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्यकला यांमध्ये विशेषत्वानं प्रतिबिंबित होताना दिसते.
वास्तू, शिल्प व चित्र यांच्या बाबतीत इतर प्रस्थापित कल्पनांचा-कलापरंपरांचा, प्रामुख्यानं बौद्ध कल्पनांचा व कलापरंपरांचा, प्रभाव सुरुवातीला जैनकलेवर होता; परंतु आकार व घडण यांबाबतीत जैनकलेनं दाखवलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे या निर्मितीला शैलीदृष्ट्या महत्त्व आलं. जैनकलेत तीर्थंकर अथवा त्यांच्या इतर अनुयायांचा ध्यानमुद्रेतला - यक्ष आणि यक्षिणी यांच्यासमवेतचा अथवा तीर्थंकरांचे रक्षक आदींचा - समूह दर्शवलेला आढळतो.
जैनकलेची वैशिष्ट्यं दर्शवणारी काही उदाहरणं अशी : सुपार्श्वनाथ तीर्थंकरांच्या चेहऱ्यावर अहिंसा, शांतता दर्शवणारे भाव आढळतात, तसंच मूर्तीची वेशभूषा, केशरचना, धर्मचिन्हं, मस्तकी सर्पमुकुट आदी वैशिष्ट्यांचा उल्लेख करावा लागेल. दिगंबर-मूर्तीमध्ये साधारणतः प्रतीकात्मक वेशभूषा नग्न आणि आलंकरण नसलेली असते.
श्वेतांबरपंथीय प्रतिमा तात्पुरत्या आलंकरणांनी सजवलेल्या, छातीवर कोरलेलं ‘श्रीवत्स’, तसंच कपाळावर तिलक असणाऱ्या अशा आहेत. कधी श्रीवत्स अष्टमंगल असलेलंही आढळतं. भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर तीर्थंकर व धर्मपीठाचं स्वामित्व करणारे स्थविर यांच्या समाधींवर स्तूप बांधण्यात आले. नंतर शिल्पांनी व भित्तिचित्रांनी युक्त अशी लेणी व कालांतरानं शिखरमंदिरांचे समूह अशी वास्तुनिर्मिती झाली.
मंदिरांच्या पायांचे आराखडे देवतानिर्दशक अशा ‘यंत्र’ आकृतींवर आधारलेले असत. वास्तूंच्या पायथ्याशी असणारे आराखडे यंत्रात्मक असणं हादेखील प्रस्थापित विचारसरणीचाच प्रभाव मानता येईल. मंदिरातली तीर्थंकर मूर्ती ही उभी (कायोत्सर्ग) अथवा योगासनात बसलेली असते. सिंहासनावर धर्मचक्र व मूर्तीच्या हृदयस्थानी चिंतामणी असतो. चिंतामणी आदी चिन्हांशिवाय मूर्तीला पूर्णत्व येत नाही.
असे काही धार्मिक आदेश शिल्प-चित्र घडवताना पाळले जातात. मंदिरासमोर मानस्तंभ उभा केला जातो. त्यामध्ये चार दिशांना चार तीर्थंकरांच्या मूर्ती अशी रचना केलेली पाहायला मिळते. तीर्थंकरांच्या सिद्धायिका, चक्रेश्वरी, अंबिका, पद्मावती आदी शासनदेवता, तसंच ‘नंदीश्वरद्वीप’ (पृथ्वीवरील स्वर्ग) वगैरे पवित्र धर्मप्रतीकं जैनलेण्यांमधल्या व मंदिरांमधल्या शिल्पांत साकारलेली आहेत.
सर्वांत जुन्या जैन वास्तू सोनभांडार (बिहार, इसवीसनपूर्व ५७) आणि उदयगिरी इथल्या होत, तसंच सौराष्ट्र, सित्तनवासल, ऐहोळे, बदामी, वेरुळलेणी (३० ते ३४), खजुराहो, ग्वाल्हेर, केरळ, राजपूताना, गुजरात अशा भारतातल्या सर्वच ठिकाणी जैन-अवशेष विखुरलेले आहेत. हे सर्व अवशेष इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंतचे आहेत, असं तज्ज्ञांनी नमूद केलेल्या कागदपत्रांवरून आढळतं.
श्रवणबेळगोळ इथली गोमटेश्वराची (बाहुबली) प्रचंड आकारातली मूर्ती, दिलबाडा-जैसलमेर इथली संगमरवरी वास्तू व शिल्पं अशी अनेक जैनश्रद्धास्थानं त्यांच्या निर्मितीतल्या अपूर्वतेमुळे कलेतली सौंदर्यस्थानं ठरली आहेत. या वास्तूंचं व मूर्तींचं प्रादेशिक व कालपरत्वे शैलींशी फार निकटचं नातं असलं तरी त्यांत जैनपरंपरेला अनुसरून ‘सत्त्वभाव’ महत्त्वपूर्ण असून, त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कालखंडानुसार विचार करता, काही महत्त्वाचे टप्पे संशोधनातून समोर येतात.
कालखंड एक (इसवीसनपूर्व ३०० ते इसवीसन १००) : जैनस्मारकातल्या (मंदिरातल्या) शिल्पकलेच्या निरुपणाच्या दृष्टीनं जैनवैशिष्ट्यांचा साधारणतः अभाव आहे; दगडात कोरलेल्या काही मूर्ती या जैन असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो, तर काही मूर्ती लाकडापासून तयार केलेल्या होत्या, ज्यांचे काही नमुने अस्तित्वात आहेत. सिंधू संस्कृतीतली नग्न-योगमुद्रावस्थेत असणारी ‘मुद्रा’ (इसवीसनपूर्व २५००) जैनधर्मीय असावी. लहानीपूरमध्ये आढळणारं कबंधशिल्प प्राचीन आहे (पाटणा इथल्या संग्रहालय ते पाहायला मिळतं), तेविसाव्या तीर्थंकरांच्या काही ‘पार्श्व’प्रतिमा-कलाकृती मुंबईत ‘छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय’ इथं आहेत.
कालखंड दोन (इसवीसन १०० ते इसवीसन ५५०) : उत्तर भारतातली जैनकला आणि मूर्तिशास्त्र यांत विशिष्ट असा बदल झाला.
कालखंड तीन (इसवीसन ५५० ते ७५०) : हा प्रयोगांचा आणि प्रात्यक्षिकांचा कालावधी मानला जातो. पटैनी, मध्य प्रदेशात गुप्तकाळात निर्मिलेल्या प्रतिमा, तसंच चंदनाच्या लाकडात कोरलेली जैन तीर्थंकरांची शिल्पं आणि काही ब्राँझ प्रतिमा आढळून येतात.
कालखंड चार (इसवी ७५० ते १२००) : विविध प्रादेशिक जैनप्रतिमांची निर्मिती या काळात झाली. यांत देवी-देवतांच्या असंख्य कलाकृती आढळतात. हंसी इथं आढळून आलेल्या ५८ ब्राँझप्रतिमा या जैन तीर्थंकरांच्या आहेत, तर असीगड किल्ला हा दिगंबर-श्वेतांबर पंथ यांच्या समकालीन संस्कृतीतून निर्मिला गेलेला आहे.
कालखंड पाच (इसवीसन १२०० ते १५००) : पश्चिम भारतातली श्वेतांबरकला (शिल्प आणि लघुचित्रकला) पूर्णपणे विकसित स्वरूपात आढळते. जैन (Rock-cut) स्थापत्याचं दर्शन वेरुळलेणी (महाराष्ट्र), दिलवाडा (माऊंट अबू,राजस्थान), जैनबस्ती (कर्नाटक) इत्यादी अनेक उदाहरणांतून दिसून येतं.
‘सोळंकी आणि मारू-गुर्जर’ शैलीतल्या स्थापत्याचा अधिक प्रभाव पश्चिम भारतात साधारणतः दहाव्या शतकाच्या आसपास दिसून येतो.
माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी अहिंसेची मूल्ये पेरणाऱ्या जैन धर्माच्या अंतरंगात अनेक सुंदर रहस्यं दडलेली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.