काम लहान किंवा मोठ नसत, काम तर काम असत

work
work

या धकाधकीच्या आणि प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात आपण काय करतोय? का करतोय? आपल्या कृतीचा स्वतःवर आणि समाजावर काय परिणाम होतोय? याबद्दल विचार करायला वेळच उरत नाही. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा आणि विकासाचा उपयोग हा बरेचदा विविध स्वरूपातील वर्गवारीला एकप्रकारे बळकट करण्यासाठीच होत असतो. जवळपास दहाएक वर्षाआधी आमिर खान एका घड्याळीच्या जाहिरातीत खुद्द एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) असूनसुद्धा संगणक दुरुस्तीचे सोपे आणि सामान्य काम हसत-हसत करताना दिसतो. त्याबद्दल विचारल्यावर तो म्हणतो, "कोणतही काम लहान किंवा मोठ नसत, काम तर काम असत.' या वाक्‍यासाठी तो बराच भाव खाऊन जातो. पण, वास्तव असेच आहे काय? तर कदाचित याचे उत्तर सगळ्यांचा तोंडून नाही, असेच निघेल. माझे काम, माझा व्यवसाय आणि माझे क्षेत्र कशाप्रकारे महत्त्वाचे आहे आणि माझ्या किंवा माझ्या कामाच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा गाडाच चालणार नाही, या स्वरूपात प्रत्येक व्यक्ती त्याचे काम आणि त्याचे महत्त्व याबद्दलचा गाजावाजाच करत असतो. पण, हे करत असताना माझेच काम श्रेष्ठ आणि बाकी सर्व दुय्यम ही वर्गवारी जन्माला येत आहे, याचा अंदाजसुद्धा आपल्याला नसतो. भारतासारख्या देशात जिथे आधीच धर्म, समाज, जात, पंथ आणि विविध न दिसणाऱ्या वर्गवाऱ्या आहेत त्यामध्ये आणखी एक कामाच्या स्वरूपातील नवीन वर्गवारी तयार करायची की नाही किंवा ही नवीन वर्गवारी समाजाला परवडेल काय? याबद्दल पण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
अभियांत्रिकीच्या काही विशिष्ट महाविद्यालयांत किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी विशिष्ट गुण लागतात. अर्थातच त्याप्रकारचे गुण मिळवणे हीसुद्धा आत्ताच्या घडीला तारेवरची कसरत होऊन बसलेली आहे. त्यामुळे प्रवेश मिळवणारे मोजकेच असतात. तिथूनच आम्ही निवडक विशिष्ट दर्जाचे आणि उरलेले ज्यांना प्रवेश मिळालेला नाही ते दुय्यम, असा शिक्षण ते काम या वर्गवारीचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला चलन अस्तित्वात यायच्या आधी वस्तुविनिमय करून व्यापार चालायचा. त्यामुळे कुठले तरी एक काम किंवा काम करणारा कारागीर हा श्रेष्ठ किंवा दुय्यम असा भेदभाव होत नसे; कारण प्रत्येक व्यक्तीचे काम आणि त्याला अवगत असलेली कला हे इतर व्यक्तींच्या कामात येत असे. पण, चलनाच्या उदयानंतर हे चित्र पालटले आणि कलेची व अवगत असलेल्या कौशल्याची समाजावर प्रभुत्व असलेल्यांनी विविध वर्गवारीत विभागणी केली. यात इतर विविध सामाजिक आणि वैयक्तिक बाबींची भर होतीच.
उदाहरणार्थ, एक गाव बऱ्याच दुर्गम भागात वसलेले. साहजिकच पिण्याचे पाणी, रस्ते, पूल यासारख्या मूलभूत सोयींचा अभाव. गावालगत असलेल्या नदीला दर पावसाळ्याला पूर येऊन हे गाव मुख्य प्रवाहापासून तोडले जाते आणि लोकांना बऱ्याच गैरसोयींचा सामना करावा लागतो. एकदा पूर ओसरला की कपडे वाटप, धान्यवाटप, रोगनिदान शिबिरे वगैरे प्रकार सुरू होतो आणि हे वर्षानुवर्षे सुरू असते. अशा प्रकारच्या कामाचा उदो-उदो करून बरीच मंडळी बक्षिसे, सन्मान, पुरस्कार वगैरे मिळवून घेतात. आता याच गावात एक व्यायसायिक कंत्राटदार गावालगतच्या नदीवर पूल बांधायचे काम शासनाकडून मिळवून घेतो. पुढील वर्ष-दोन वर्षांत तो पुलाचे काम पूर्ण करतो. पुलाच्या बांधकामात गावातील काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि बऱ्यांच पिढ्यांपासून पुराचा तडाखा सोसत असलेल्या गावाला तो या जाचापासून मुक्त करतो. आता पुराचा हा प्रश्नच मुळासकट बंद होऊन जातो. त्यामुळे पुरामुळे नेहमी उभे टाकणारे प्रश्न आता येत नाही. पुराच्या वेळी वैद्यकीय आपत्ती असेल तरी दवाखान्याचा मुख्य ठिकाणी कधीही जाता येत आणि कुठलेच काम रस्त्याअभावी थांबत नाही.
पण, वर्षानुवर्षे एकाच कामाचे (प्रामाणिक/अप्रामाणिक) भांडवल करून सामाजिक पुरस्कार मिळवणाऱ्यांना नेहमीच आपण डोक्‍यावर मिरवतो आणि कंत्राटदार (प्रामाणिक/अप्रामाणिक) ज्याने समस्यांचे मूळच नष्ट केले, त्याला नेहमीच भ्रष्ट आहे, नीती आणि मूल्यांचा अभाव आहे वगैरे वगैरे बोलत असतो. काम करूनही अशा हिणवणाऱ्या वर्गवारीला सामोरे जावे लागणे हे कुठल्या प्रगत आणि सुशिक्षित समाजाचे लक्षण आहे? हे एक कोडेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com