सातारा : दरडग्रस्तांसाठीच्या घोषणा विरल्या हवेतच

तारळे भागात निवारा शेड वाऱ्यावरच; बोलाचीच कढी अन्‌ बोलचाच भात असा प्रत्यय
ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात
ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात sakal

तारळे : जुलै महिन्यातील महाप्रलयंकारी तीन दिवस पाटण तालुक्यासाठी काळरात्र ठरले. काही घरे, माणसे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. काही गावांवर भूस्खलनाची टांगती तलवार कायमची उभी राहिली. त्या गावांतील लोक अजूनही दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. या गावांचे तात्पुरते स्थलांतर आजूबाजूच्या गावांतील शाळेत केले. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी संबंधित गावात दौरे करून लोकांना धीर देऊन तात्पुरती निवारा शेड तातडीने उभी करण्याची आश्वासने दिली. मात्र, ही आश्वासने पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र तारळे विभागात दिसत असून, अडीच महिन्यांनंतरही निवारा शेड वाऱ्यावरच आहेत. शासन व प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन दरडग्रस्तांच्या भावनांशी खेळत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

२१, २२ व २३ जुलैचा प्रचंड पाऊस आठवला तरी आजही धडकी भरत आहे. ज्या गावात दरडी व भूस्खलनाचा धोका उद्‌भवला त्या गावातील नागरिकांचा भीतीने थरकाप उडाला होता. ग्रामस्थ असेल तसे आहे त्या स्थितीत बाहेर पडले किंबहुना प्रशासनाने जीवितहानीच्या भीतीने बाहेर काढले. तारळे भागातील जुगाईवाडी, बागलेवाडी, कळंबे, डफळवाडी, गायमुखवाडी, बोर्गेवाडी आदींना फटका बसला. त्या त्या गावातील बधितांचे आसपासच्या गावातील शाळांमधून स्थलांतर करण्यात आले. भयभीत झालेल्या जनतेला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धीर देत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या मदती केल्या. प्रशासकीय मदतदेखील बधितांना मिळाली. तालुकास्तरीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी बाधित गावांना भेटी देऊन जनतेला भयमुक्त करून पुनर्वसनासाठी आश्वस्त केले. मदतही केली. तात्पुरते निवारा शेड बांधून देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्नशील राहू, असे अभिवचनही दिले.

ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात
कोरोनाबाधितांवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच उपचारासाठी दक्षता घेतली : डॉ. काळे

मात्र, कायमस्वरूपी पुनर्वसन राहिले दूरच अजून तात्पुरत्या निवारा शेडची एक विटही रचली गेली नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या घोषणा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या की काय, असा सवाल दरडग्रस्त जनता विचारत आहे. सध्या परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. दरडग्रस्तांच्या उरात पुन्हा धडकी भरू लागली आहे. महिन्यात निवारा शेड उभी करू म्हणून आश्वस्त केले. परंतु, अडीच महिने झाले तरी निवारा शेडचा पत्ताच नाही. याविरुद्ध दरडग्रस्त गावातील जनतेकडून रोष व्यक्त होत असून, केवळ बोलाचीच कढी अन्‌ बोलचाच भात, असा प्रत्यय येत आहे. तर प्रशासन दरडग्रस्तांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. या निवारा शेडसाठी कोणता मुहूर्त प्रशासन काढण्यात मग्न आहे, हे कळायला मार्ग नाही. शासन व प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष दरडग्रस्तांच्या भावनांशी खेळणारे आहे, अशी संतप्त भावना येथे व्यक्त होत आहे.

परतीचा पाऊस सुरू आहे. भूस्खलनाच्या भीतीने झोप लागत नाही. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. आम्हाला अजून निवारा शेड मिळाले नाहीत, तर पक्के पुनर्वसन होणार कधी ?

-रामचंद्र जाधव, ग्रामस्थ, कळंबे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com