बालपण वाचविण्यासाठी धडपणारी 'चाईल्ड लाइन'!

बालपण वाचविण्यासाठी धडपणारी 'चाईल्ड लाइन'!

सातारा : समाजातील निराधार, घरातील व समाजातील शोषणांनी त्रस्त, लैगिंक अत्याचाराला बळी पडलेले, निवारा शोधणारे, बाल कामगार, हरवलेली व भावनिक आधार शोधणारी बालके यांच्यासाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाइन संस्थेचे सातारमध्ये उत्तम काम सुरू आहे. सुरुवातीला काम करीत असताना सर्वात जास्त बालकांसंबंधी केसेस या रात्री येत असल्याचे स्वयंसेवकांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिस ज्याप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करतात, त्याप्रमाणे आपण बालकांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाईट पेट्रोलिंग सुरू करणे योग्य ठरेल, असे मत काही स्वयंसेवकांनी मांडले व शहरामध्ये चाइल्ड लाइनने नाईट पेट्रोलिंग करण्याचा उपक्रम हाती घेतला. 

सिग्नलला गाडी थांबली की गाडीवर कापड मारणारी... बस स्टॅण्ड, गर्दीचे रस्ते, मंदिरे याठिकाणी केविलवाण्या नजरेनं पैशासाठी हात पसरणारी... कुठल्यातरी देवी, देवतेचे चित्र ताटात घेऊन त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारी... कधी चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थाचे स्टॉल याठिकाणी भांडी विसळणारी... कचरा-कोंडाळा, मोठ्या पाईप किंवा अन्य घाणेरड्या जागी व्यसने करणारी... अशा एक ना अनेक रुपात बकाल अवस्थेत उदास चेहऱ्याने आणि शून्य नजरा घेवून फिरणारी अनेक बालकं आपणास दिसतात. कधी सरावाने आपण खिशात हात घालतो आणि एक-दोन रुपयाचं नाणं या मुलांच्या हातावर ठेवतो.

कधी इतक्याच सरावानं त्यांना रागानं दूरही करतो. पण, ज्या घटकांकडे तुच्छतेनं अथवा कीव करीत पाहिलं जात. त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या मदतीसाठी, त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांचं बालपण वाचविण्यासाठी आणि जपण्यासाठी धडपणारी यंत्रणा म्हणजे चाईल्ड लाईन अर्थात 1098. चाईल्ड लाइन हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत शून्य ते  १८ वयोगटातील मुला-मुलींकरिता मोफत चालवली जाणारी सेवा आहे. व्यसनमुक्ती,  बालमजुरी, बालविवाह, बाल भिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये चाईल्ड लाईन २४ तास कार्यरत असते. यासाठी १०९८ हा क्रमांक डायल करावा. दरम्यान, दरवर्षी सातारा जिल्ह्यात तीन हजार मुलांना चाईल्ड लाइन मार्फत शालेय मदत पोहचवली जात असल्याची माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर सुधीर तुपे यांनी 'सकाळी'शी बोलताना दिली. 

बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याने चाईल्ड लाइनने गेल्या ८ वर्षात ५३८ बालविवाह थांबवले आहेत. या कामात कार्यरत महिला व बालकल्याण विभाग, सेवा बालकल्याण समिती सातारा, जिल्हाधिकारी,  जिल्हा पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने हे कार्य पार पाडले जाते. सन २०१८- २०१९ या कलावधीमध्ये ४३ बालविवाह थांबविण्यात आले आहेत. या प्रसंगी लोकांच्या रोशाला ही सामोरे जावे लागते, परंतु पोलीस सोबत असल्याने बालविवाह थांबविणे सोपे जाते. 

गेल्या वर्षात ४१० बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. ३५२ मुलांना वैद्यकीय मदत करण्यात आली. १२० मुलांना बालकल्याण समितीच्या मदतीने बालगृहामध्ये आश्रय देण्यात आला. लॉकडाऊनमध्ये लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट व चाईल्ड लाइनच्या मदतीने ३ हजार ५०० मुलांना आहार देण्यात आला आहे. १४७ मुलांना गेल्यावर्षात समुपदेशन करून अडचणीतून बाहेर काढले आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचार झालेल्या ६७ मुलांची यातून सुटका करण्यात आली. 

गेल्या वर्षभरात सातारा जिल्ह्यातील २६ शाळांमध्ये जाऊन २२ हजार शालेय मुलांना चाईल्ड लाइनविषयी माहिती पोचवण्यात आली. २४ तास कार्यरत असलेल्या चाईल्ड लाइन प्रकल्पामुळे काळजी व स्वरक्षणची गरज असलेल्या अनेक मुलांना आपापल्या घरी पाठविले आहे. चाईल्ड लाइनने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, मुले स्वखुशीने रस्त्यावरचे जीवन पत्करत नाहीत. तर आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचे बळी असतात, असेही तुपे यांनी सांगितले.

व्यसनमुक्ती : घरात मोठी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर मुले त्यांचे अनुकरण करतात. आपल्या वयापेक्षा मोठ्या किंवा बरोबरीच्या व्यसनाधीन मुलांच्या संगतीनेही ती व्यसनाच्या नादी लागतात. यातील अनेक बालकांना पेट्रोलचा वास घेणे, दारू पिणे, गुटखा खाणे अशा सवयी असतात. त्याबाबत चाईल्ड लाईनकडे मदतीसाठी दूरध्वनी आले. अशा अनेक मुलांचे चाईल्ड लाइनने समुपदेशन व मानसोपचारतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाद्वारे पुनर्वसन केले आहे.

बाल भिक्षेकरी : चाईल्ड लाइनने आजपर्यंत बऱ्याच बाल भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन केले आहे. कधी घरची परिस्थिती बिकट असल्याने आई-वडील मुलांना भीक मागायला पाठवितात. मुलांना पैशाचे आकर्षण असते म्हणून भीक मागितली जाते. अशा स्थितीत चाईल्ड लाइन प्रथम धाडी टाकते व यात सापडलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना समज दिली जाते.

बालविवाह : बालविवाहाच्या कारणांमध्ये घरची परिस्थिती गरीब असणे, प्रेम-प्रकरणांची कुणकुण लागल्यास कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार, कुटुंबात भावंडांची संख्या जास्त असल्यास जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी बालविवाह केले जातात. बालविवाहाचा मुलीवर मानसिक व शारीरिक विपरीत परिणाम होतो. आता कायद्याने ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत.

लैंगिक शोषण : अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये चाईल्ड लाइन शोषित मुलींना व त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करते. पुन्हा नव्याने आयुष्यात पुढे जगण्यासाठी प्रोत्साहित करते. शोषितांच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा विचार करून चाईल्ड लाईन पुनर्वसनाचे काम करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com