
Congress : काँग्रेसची निर्मिती इंग्रजांनी केली; अजयकुमार मिश्रा
उंब्रज (जि.सातारा) : देशातील सत्ता गेल्यामुळे काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टिका करीत आहेत. मुळात काँग्रेसचा जन्म इंग्रजांना मदत करण्यासाठी झाला होता तर काँग्रेस पक्षाची निर्मिती करणारे हे इंग्रज होते.
संपूर्ण स्वतंत्र्याची मागणी प्रथम सरसंघचालक हेगडेवार यांनी केली, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात दुर्बल घटक संवाद मेळव्यात ते मंगळवारी बोलत होते.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अतुलबाबा भोसले आदी उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने देशात अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतरच्या भारताची संकल्पना डॉ. आंबेडकर यांनी मांडली होती परंतु स्वातंत्र्यानंतरचे सरकार हे आंबेडकरांच्या विचाराचे नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्बल व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबवून त्यांना सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. देशाला ताकदवान बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मोदींनी एक संघ भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. देशाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारा पक्ष आहे. मोदींनी घटनेमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न केला नाही परंतु त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण केला जात आहे.
- शिवेंद्रराजे भोसले, आमदार, भाजप