
-सचिन शिंदे
कऱ्हाड: सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांना जागा देण्यासाठी शासनाकडून गावागावांत वापरात नसलेल्या रस्त्यांचे हक्क उठवून त्या जागा घरकुलांसाठी देण्याची योजना हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यात त्याचा सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात बेघरांना हक्काचे घर मिळणार आहे. शासनाच्या अन्य विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग केलेल्या वापरात नसलेल्या पाणंद रस्त्यांसहित गावांतर्गत रस्ते, रस्त्यांच्या सीमेमधील रस्त्यांच्या रुंदीकरणासहित विकासासाठी भविष्यात न लागणाऱ्या जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यांचे हक्क उठवले जाणार आहेत. त्याचा सर्व्हे तालुकापातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार अतिक्रमण झालेली घरकुले नियमित करण्यात येणार आहेत.