प्लॅस्टिक, थर्माकॉल ठरतेय स्वच्छतेत बाधा; कऱ्हाडला ठोस उपायांची गरज

प्लॅस्टिक, थर्माकॉल ठरतेय स्वच्छतेत बाधा; कऱ्हाडला ठोस उपायांची गरज

कऱ्हाड (जि. सातारा) : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरातील कचरा कोंडाळी गायब होऊन दोन वर्षे झाली. शहरात स्वच्छतेची सवयही लागत आहे. कोंडाळ्यांच्या जागी रांगोळ्या रेखाटल्या जात आहेत. पालिकेसह नागरिक, संस्था स्वच्छतेत पुढाकार घेत आहेत. बाजारपेठेतील कचऱ्यावर अद्याप अद्यापही पूर्ण नियंत्रण ठेवता आलेले नाही. बाजारपेठेतील प्लॅस्टिक, थर्माकॉल, मोठे पुठ्ठ्यांचे बॉक्‍स असा कचरा स्वच्छतेत बाधा ठरतो आहे. 

शहरात शोरूमसह मोठ्या व्यापाऱ्यांच्या पार्सलमधून येणारे थर्माकॉल, प्लॅस्टिक कागद व पुठ्ठ्याची विल्हेवाट लावली जात नाही. पालिकाने त्यासाठी खास दोन ट्रॅक्‍टर ठेवले आहेत. मात्र, त्यातही कचरा टाकला जात नसल्याने अनेकदा जुन्या कोंडाळ्याच्या ठिकाणी तो कचरा पडल्याचे दिसते. अनेकदा रात्री उशिरा एखाद्या कोपऱ्यात कचरा टाकला जात आहे. अनेकदा थेट गटारीत टाकण्याचेही प्रकार केले जातात. अशा कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असल्याने गटारे तुंबत आहेत. थर्माकॉलही कोंडाळे नसलेल्या टिकाणी ढीग लावून टाकलेला दिसतो. पालिकेने संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत. त्यावर पूर्ण नियंत्रणासाठी कारवाईची गरज आहे. शहरात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत चांगले काम झाले. त्यासाठी पालिकेने जय्यत तयारीही केली आहे. शहरातील सर्वच कोंडाळी काढण्यात आली. कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्याचे फलकही अनेक ठिकाणी आजही आहेत. घंटागाडी नियमित सुरू आहे. शहरात घरटी बकेट वाटली आहेत. त्याला नागरिकांनाही चांगली साथ दिली आहे. नागरिकांनी बहुतांशी सार्वजनिक कचरा टाकण्याचे बंद केले आहे. कोंडाळी उचलून नेल्यामुळे सतत घाणीच्या साम्राज्यातील अनेक परिसर स्वच्छ दिसू लागला आहे. त्यात पालिका व नागरिक यांच्या समन्वयातून चांगले यश आले आहे. मात्र, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या कचऱ्याचा प्रश्न अद्यापही शहरातील स्वच्छतेला बाधा ठरतोय, की काय अशी स्थिती आहे. त्याकडे पालिका व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

शहरात मुख्य बाजारपेठेत मोठे शोरूम, व्यापारीही आहेत. त्यांचा माल येताना मोठ्या पार्सलमधून येतो. ती पॅक करण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकसह थर्माकॉलचा वापर करतात. त्याशिवाय मोठ्या वस्तू पॅकिंगसाठी मोठ्या पुठ्ठ्यांचाही वापर होत असतो. कंपनीतून थेट संबंधित व्यापाऱ्यांपर्यंत डिलिव्हरी देतात. त्या मालास नुकसान होऊ नये, म्हणून कंपन्या काळजी घेतात. व्यापाऱ्यांकडे तो माल आला, की त्याचे पॅकिंग फोडले जाते. त्या वेळी कंपनीने थर्माकॉलसह प्लॅस्टिक कागद व कागदी पुठ्ठे संबंधित व्यापारी शोरूममध्ये दिवसभर ठेवतात. त्यांच्याकडे त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे पालिकेचा कचरा गोळा करणारा ट्रक्‍टर येण्याची वाट पाहतात. बहुतांशी व्यापारी त्यात तो कचरा टाकतात. मात्र, दिवसभर ठेवलेले प्लॅस्टिकसह काही जण रात्री उशिरा गाडीत भरून थेट नदी कडेला टाकताना दिसतात. त्यावर उपायाची गरज आहे. काही जण त्यांचा कचरा पुलावरून थेट नदीत टाकतात. रात्री उशिरा नागरी वस्तीतून पालिकेने हटवलेल्या कोंडाळ्याच्या ठिकाणी पिशवीत पॅक करून कचरा टाकला जातो. पर्यायाने तो कचरा पालिका व नागरिकांच्या स्वच्छतेच्या मोहिमेला थेट बाधा येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. 

अशी आहे स्थिती 

  • मोठ्या पार्सलच्या पॅकिंगचे मोठे पुठ्ठे, प्लॅस्टिकसह थर्माकॉलची अडचण 
  • पॅकिंगसाठीच्या पुठ्ठ्यांची विल्हेवाट न लावता मोकाळ्या जागेत टाकण्याचा प्रकार 
  • व्यापाऱ्यांकडून दिवसभर ठेवलेले प्लॅस्टिकसह पुठ्ठे नदी कडेला टाकला जातो 
  • काही जणांकडून पुलावरून कचरा थेट नदीतही सोडला जातो 
  • पालिकेने कोंडाळी हटवली, मात्र काही जण तेथे पिशवीत पॅक करून टाकतात कचरा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com