Jayant Patil : पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी लढायचं आहे

दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात आयोजित माण विधानसभा मतदारसंघाच्या विजय निश्चय मेळाव्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते.
Jayant patil
Jayant patilSakal

दहिवडी - महाराष्ट्राची परिस्थिती सध्या अतिशय वेगळी आहे. पोलिस ठाण्यात जावून आमदार गोळीबार करतो हे कधीही न पाहिलेलं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण भारत अन महाराष्ट्राच्या, पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी लढायचं आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात आयोजित माण विधानसभा मतदारसंघाच्या विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुभाषराव शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, माण-खटावचे नेते प्रभाकर देशमुख, युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, अनुराधा देशमुख, प्रा. कविता म्हेत्रे, मकरंद बोडके, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, बाळासाहेब सावंत, राजेंद्र साळुंखे, प्रियांका माने, महेश जाधव, सुरेंद्र मोरे, प्रशांत विरकर, विक्रम शिंगाडे, परेश व्होरा, तानाजी कट्टे, पृथ्वीराज गोडसे, संजना जगदाळे, अभय वाघमारे, जयसिंह राजेमाने, योगेश जाधव, सुर्याजीराव जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, मागील काही वर्षात महाराष्ट्राचा कमी अन गुजरातचा जास्त फायदा झालाय. आपलं राज्य दुसर्‍या राज्याचा दावणीला बांधायचं काम होतंय. पोलिस सरकारचे नोकर आहेत की एका पक्षाचे हेच समजत नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या अन प्रभाकर देशमुख यांना विजयी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करा.

बाळासाहेब पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्राचा बिहार झाला असून सर्व प्रशासन अतिशय दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे आपल्या मताच्या ताकदीने लोकसभा निवडणुकीत या सरकारला त्यांची जागा दाखवू.

प्रभाकर देशमुख म्हणाले, माण-खटाववरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी जलसंपदामंत्री असताना जयंत पाटील यांनी अधिकचे पाणी उपलब्ध करुन दिले. मात्र आमच्या आमदारांना शासन निर्णय कसा वाचावा हे चौदा वर्षे झाले समजले नाही. तारळीचे पाणी मिळणार नाही असे बनगरवाडीकरांना आमदार म्हणाले.

मात्र आम्ही बनगरवाडीत पाणी आणले अन हे प्रथम आंघोळ करायला तिथे पोहचले. म्हसवडला बंगळूर-मुंबई कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक वसाहत विकसित होत असेल तर ती फक्त शरद पवार यांच्यामुळेच. मागील काही वर्षात आम्ही २१०० तरुणांना नोकरी देण्यात यशस्वी झालो आहोत.

अभयसिंह जगताप म्हणाले, तुरुंगात जाण्याच्या भितीने आमचेच सहकारी जेव्हा निष्ठा विकतात त्यावेळी ज्याचं रक्त उसळतं त्यापैकी मी एक आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहे. त्यामुळे हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे असं समजून मी मैदानात उतरलोय. माढा मतदारसंघातून कमळ वर जावू देणार नाही हा माझा निर्धार आहे.

पाण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाने केलंय तुम्ही फक्त वाढपी आहात जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांचा आमदार जयकुमार गोरे यांना टोला.

'जयकुमार गोरेच्या अंगात जयकांत शिक्रे आलाय. पण त्याला माहिती नाही प्रभाकर देशमुख सिंघम आहेत. टप्प्यात आणून त्याचा कार्यक्रम लवकरच केला जाईल. राष्ट्रवादीतून गेलेल्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा.'

- मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

फलटणकरांची पंचाईत झालीय. इकडं आड तिकडं विहीर. तिकडं विहीरीत पाणी नाही इकडं थोडंफार पाणी आहे असा टोला जयंत पाटील यांनी सुभाषराव शिंदे यांच्याकडे पाहत रामराजे नाईक-निंबाळकर यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com