
आमदार मकरंद पाटील व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनल सर्व जागांवर विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे.
राष्ट्रवादीच्या आमदाराचा करिष्मा; खंडाळा कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व
लोणंद (सातारा) : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Khandala Sugar Factory Election) आज (ता. १९) झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखालील बाळसिध्दनाथ संस्थापक शेतकरी सहकार पॅनल (Balsiddhanath Farmers Cooperative Panel) दारुण पराभवाच्या छायेखाली असून आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil) व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनल सर्व जागांवर विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे हे स्वतः त्यांच्या खंडाळा गट क्रमांक 1 मधील बालेकिल्यात ९०२ इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले आहेत, त्यांना २ हजार ५४३ मते मिळाली. तर शेतकरी परिवर्तन पॅनलने या गटात तीनही जागेवर विजय मिळवला आहे. शेतकरी परिवर्तन पॅनलचे अशोक गाढवे यांना ३ हजार ३५८, दत्तानाना ढमाळ यांना ३ हजार ४४५, चंद्रकांत ढमाळ यांना ३ हजार ३९० मते मिळाल्याने ते या गटातून विजयी झाले आहेत. संस्थापक पॅनलचे रविंद्र ढमाळ यांना २ हजार १९९, अशोक ढमाळ यांना २ हजार २२४ मते मिळाल्याने ते पराभूत झाले आहेत. अपक्ष उमेदवार संतोष देशमुख यांना ७७ मते मिळाल्याने ते पराभूत झाले. संस्था व बिगर उत्पादक मतदार संघातून शंकरराव गाढवे यांचे चिरंजीव अनिरुद्ध उर्फ संजीव गाढवे यांनाही पराभव पत्कारावा लागला आहे. शेतकरी परिवर्तन पॅनलचे गजानन धुमाळ यांनी ८२६ मते मिळवून अनिरुद्ध गाढवे यांना ४५७ मतांनी धूळ चारली आहे.
अनिरूध्द गाढवे यांना ३६९ इतकीच मते मिळाली आहे. शिरवळ गटातून शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे नितीन भरगुडे-पाटील हे ३ हजार ५३२ मते, विष्णू तळेकर ३ हजार ४२६, अनंत उर्फ राजेंद्र तांबे ३ हजार ५१८ मते मिळल्याने ते १ हजार १९९ मताधिक्याने विजयी झाले आहेत. संस्थापक पॅनलचे साहेबराव महांगरे यांना २ हजार ३३, संजय पानसरे यांना २ हजार २५४, चंद्रकांत यादव यांना २ हजार १९० मते मिळाल्याने ते पराभूत झाले आहेत. बावडा, भादे, लोणंद व अन्य कॅटॅगरीच्या मतदार संघातील मत मोजणी सुरू आहे. मात्र खंडाळा, शिरवळ गट व संस्था मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनलने विजय मिळवल्याने अन्य सर्व गटात हाच ट्रेन राहणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उधळण करत विजयोत्सव साजरा केला. अमदार मकरंद पाटील यांनीही येथे उपस्थित राहुन विजयी उमेदवारांचे अभिनंद केले.