जाणून घ्या नवी नियमावली : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी व्यावसायिकांसह गावकारभाऱ्यांवर भिस्त

जाणून घ्या नवी नियमावली : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी व्यावसायिकांसह गावकारभाऱ्यांवर भिस्त

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे व्यापारी, रास्त भाव, किरकोळ दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांवर सातारा जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. या सर्वांसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात नागरिकांकडून होणारे दुर्लक्ष पाहता तेथे कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे.
 
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दररोज सुमारे दोनशेच्या दरम्यान बाधित सापडू लागले आहेत. ही बाब सातारा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय स्वतः जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे दुकानदार, तसेच भाजीपाला दुकानांसाठी नियमावली लागू केली आहे. त्यामध्ये दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानदारांनी पांढऱ्या रंगात चौकोनी, गोल मार्किंग करावे, एकावेळेस दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांना घेऊ नये, तसेच पाच ग्राहकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर राखणे बंधनकारक असेल. दुकान परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे आवश्‍यक आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी कायमस्वरूपी मास्क घालणे बंधनकारक आहे. भाजी विक्रेत्यांनी एकाच वेळी जास्त ग्राहक जमणार नाहीत, याची दक्षता घ्यायची आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर एक हजार रुपये दंड आकारला जाईल, तसेच पुढील सात दिवस दुकान सक्तीने बंद ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
 
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सरपंच हा समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. तलाठी हे सहअध्यक्ष, सोसायटीचा सचिव, कृषी सहायक, आरोग्य सेवक, महिला बचतगट ग्राम संघ अध्यक्ष, महिला बचतगट सचिव, पोलिस पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे या समितीचे सदस्य असतील. ग्रामसेवक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. परजिल्ह्यातून, तसेच पर राज्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ही समिती उपाययोजना करेल. या समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून अशासकीय संस्था, स्वयंसेवकांचीही नियुक्ती करता येईल. या समितीवर गावातील बाधितांचे विलगीकरण करणे, त्यांच्या संपर्कात इतरांना येऊ न देणे, त्यांना दैनंदिन अत्यावशक सेवेतील वस्तूंचा पुरवठा करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घेणे आदी कामांची जबाबदारी असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com