व्वा, क्या बात है.. महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात १४६७ गावं पितात शुध्द पाणी

व्वा, क्या बात है.. महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात १४६७ गावं पितात शुध्द पाणी

सातारा : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध साथीचे आजार पाहायला मिळतात; पण यावर्षी कोरोना साथीच्या काळातही एकाही ग्रामपंचायतीत दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागलेले नाही, त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागाने केलेल्या पाणी तपासणीत एकाही ग्रामपंचायतीला 'रेड कार्ड' मिळाले नाही. नऊ ग्रामपंचायतींना पिवळे, तर एक हजार 467 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना आगामी काळात आणखी सुधारणा करण्याची अपेक्षा आहे. 

निर्मलग्राम व ग्रामस्वच्छता अभियानाचा परिपाक म्हणून जिल्ह्यात दूषित पाण्यापासून होणारे साथरोग कमी होऊ लागले आहेत. ज्या गावांचे जलस्रोत ओढे, नाले किंवा नदीच्या काठाने आहेत, अशा ठिकाणी जलस्रोत दूषित होण्याची भीती अधिक असते. यासंदर्भात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. परिणामी, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेवर अधिकाधिक भर दिला जातो. स्वच्छता अभियान व निर्मलग्राम याकडे आता ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जी गावे निर्मल होऊनही पुन्हा अस्वच्छच राहिली, अशा गावांत पाणी दूषित असू शकते; पण पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ नयेत यासाठी काही गावांत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर दूषित स्त्रोत बदलून नव्याने पाणी योजना करण्यात आल्या आहेत.

तसेच काही गावांनी आरओसारखी व्यवस्थाही केलेली आहे; पण ज्या गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी नदीपात्र किंवा ओढ्याच्या कडेने आहेत, अशा गावांना दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता ही परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत एकाही गावातील जलस्त्रोत दूषित आढळलेला नाही. त्यामुळे एकाही गावाला रेड कार्ड मिळालेले नाही. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे आगामी काळात पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन साथीचे रोग येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

निर्मलग्राम व स्वच्छता अभियानाचा परिपाक म्हणजे गावागावांतील स्वच्छता झाली. पाण्याचे दूषित होणारे स्त्रोत थांबविले गेले. त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार तोंड वर काढू शकलेले नाहीत. प्रत्येक वर्षी आरोग्य विभाग जिल्ह्यातील गावांच्या पाण्याचे स्त्रोत व तेथील पाणीपुरवठा योजनांच्या पाण्याची तपासणी करते. यावर्षी झालेल्या तपासणीत जिल्ह्यातील एक हजार 467 ग्रामपंचायतींना ग्रीन कार्ड देण्यात आलेले आहे, तर नऊ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड मिळाले आहे. मात्र, रेड कार्ड एकाही ग्रामपंचायतीला मिळालेले नाही.

रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनच्या त्या प्रकरणावर राष्ट्रवादी आक्रमक
 
जिल्ह्यातील ज्या नऊ गावांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे, या गावांनी आपले जलस्रोत दूषित होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करावी हा त्यामागचा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने सुरवात केली आहे. पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती असते. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या साथीच्या आजारांबाबत जागृती करण्याकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. 


376 जलस्रोत दूषित होण्याचा धोका 

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार 376 गावांचे जलस्रोत दूषित होण्यासाठी अतिधोक्‍याचे मानले जात आहेत. या गावांना पावसाळ्यात पाणी प्रदूषित होण्याचा धोका आहे. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने या गावांतील स्त्रोतांची तपासणी करून तेथे तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, अन्यथा पावसाळ्यात या गावांना साथीच्या आजाराने ग्रासले जाण्याची भीती आहे. गावांत साथीचा रोग पसरु नये, यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com