हलगर्जीपणामुळे साताऱ्याचे आरोग्य धोक्‍यात

हलगर्जीपणामुळे साताऱ्याचे आरोग्य धोक्‍यात

सातारा : जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालयात अशांतता माजली असून, सर्वजण आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थीती चिघळण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत. परंतु, या सर्वांच्या सुरक्षीततेसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना, त्याही शासकीय निकषानुसार करणेही रुग्णालय व्यवस्थापनाला शक्‍य झालेले नाही. सुरवातीपासूनच या कोरोना फायटरच्या सुरक्षीततेबाबत दक्षता घेतली गेली नाही. अगदी पिपिई किट मिळविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना झटावे लागले. त्यानंतरही त्यांची परवड थांबली नाही.
 
कोरोना वॉर्डमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णाच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्यापासून त्यांचे कुटुंबीय व ते ज्या ठिकाणी फिरतात, तेथील लोकांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी दक्षता घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी त्यांच्या व समाजाच्या सुरक्षीतेसाठी त्यांची राहण्याची व जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. परंतु, तीही रुग्णालय व्यवस्थापनाला हे शक्‍य झालेले नाही. कोरोना वॉर्डमध्ये काम करणारे आपल्या घरी जात आहेत. समाजात काही ना काही कारणाने मिसळत आहेत. 

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्यांना चक्राकार पद्धतीने नेमणूका देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यालाही रुग्णालय व्यवस्थापणाने हरताळ फासला आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना वॉर्डमध्ये सात दिवस काम केल्यानंतर संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्याने सात दिवस क्वारंटाईन व्हायचे आहे. त्यानंतरच त्याला नॉन कोरोना वॉर्डमध्ये ड्यूटी द्यायची. अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने पथके करून त्यांच्यावर आळी-पाळीने कोरोना वॉर्डची ड्यूटी येईल, अशा पद्धतीने नियोजन करणे अपेक्षीत होते. परंतु, ओरड केल्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व परिचारीकांच्या बाबतीत काही प्रमाणात हा नियम लागू केला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांना हा नियम लागू केलेला नाही. त्यामुळे कोरोना वॉर्डमध्ये काम करणार वैद्यकीय अधिकारीही नॉन कोव्हीड वॉर्ड व अन्य विभागात काम करत आहे, फिरत आहे. सातत्याने कोरोना वॉर्डच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलनही ढासळले आहे. 

सर्वात मोठा धोका जर वैद्यकीय अधिकारी पॉझीटीव्ह आल्यावर होणार आहे. कारण तो कोरोना वॉर्डमध्ये काम करताना व काम केल्यानंतर सात दिवस पूर्णपणे क्वारंटाईन नाही. त्यामुळे त्याच्यापासून अन्य वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व कर्मचाऱ्यांना
कोरोनाचा धोका आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना व साताऱ्यातील अन्य व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होऊ शकतो. साताऱ्यात फारसा न पसरलेल्या कोरोना जिल्हा रुग्णालयाच्या गैरकारभारमुळे पसरू शकतो. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे पालक आहेत. एखाद्या विभागात योग्यपद्धतीने काम होत नसेल तर, त्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्‍यक आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यामध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे. 

आंदोलनाच्या पवित्र्यात  जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व चतुर्थश्रेणी कर्मचारी पुरते हतबल झाले
आहेत. वारंवार निदर्शनास आणून, मागणी करूनही योग्य ते निर्णय घेण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याबाबत आम्ही आज निवेदन दिले आहे.
व्यवस्थापनाच्या अकार्यक्षमतेमुळे सर्वजण आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत असे चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com