
सातारा : सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी एक लाख दोन हजार 923 मेट्रिक टन इतक्या खतांचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी मेअखेर 30 हजार 300 मेट्रिक टन इतका पुरवठा झाला आहे. मागील शिल्लक मिळून एकूण उपलब्धता 59 हजार 943 मेट्रिक टन इतकी आहे. एप्रिलपासूनची विक्री 47 हजार 173 मेट्रिक टन इतकी आहे. सद्यःस्थितीत 25 हजार 857.74 मेट्रिक टन इतका खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया 5267, डीएपी 3819, एमओपी 2598, एसएसपी 1027.2, एनपीके 13144 मेट्रिक टन उपलब्ध आहे. खतांमध्ये युरियासाठी मागणी तुलनेने जास्त प्रमाणात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यास 3700 मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तीन हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार आहे. सद्यःस्थितीत युरिया व इतर सर्व खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात आहे.
बियाणांमध्ये एकूण मागणी 47 हजार 804 क्विंटल असून, त्यामध्ये सोयाबीनची मागणी 17 हजार 063 क्विंटल आहे, तर आजअखेर महाबीज 2883 क्विंटल व खासगी कंपन्या 8361.65 क्विंटल व इतर असे एकूण 11 हजार 309.35 क्विंटल इतके बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी 4362.45 क्विंटल बियाण्याची विक्री झालेली आहे. सध्या 6946.90 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. भात पिकाच्या बियाणाची मागणी 13 हजार क्विंटल इतकी आहे. यापैकी महाबीज 1684.65 क्विंटल, एनएससी 110 क्विंटल, खासगी 4313.26 क्विंटल, इतर 230 क्विंटल असे एकूण 6337.91 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यापैकी आजअखेर 2933.60 क्विंटल बियाणाची विक्री झाली आहे. सद्यःस्थितीत 3404.31 क्विंटल बियाणे विक्रीसाठी शिल्लक आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी या बैठकीत सांगितले.
कृषी विभागामार्फत बांधावर खत व बियाणे वाटप मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आजअखेर 933 शेतकरी गटांमार्फत 4073.80 मेट्रिक टन खते व 1975.23 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. पीक उत्पादनवाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांना शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सन 2020-21 या वर्षामध्ये मका-114, सोयाबीन- 175, भात- 69, ऊस- 40 अशा एकूण 398 शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.
टोळधाडीविरोधात पेटवा मशाली
टोळधाड प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. टोळ रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतात मशाली पेटवून, तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक झाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी, असे श्री. राऊत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.