लॉकडाऊनमध्ये यामुळे झाले जिल्ह्याचे ३६ कोटींचे नुकसान

लॉकडाऊनमध्ये यामुळे झाले जिल्ह्याचे ३६ कोटींचे नुकसान

कऱ्हाड : कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयांतील काम व मुद्रांक व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे जिल्ह्याला सुमारे 36 कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. हे नुकसान भरून काढण्याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

राज्यात 22 मार्चपासून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन सुरू झाले. तो अद्यापपर्यंत कायम आहे. मात्र, शासनाने पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा, सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये बंद होती. दरम्यान, मार्चच्या 20 तारखेपर्यंत जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीप्रमाणे दस्त नोंदणीचे व्यवहार झाले. जिल्ह्यात 15 दुय्यम निबंधक कार्यालय असून, त्यात कऱ्हाड, सातारा, फलटण येथे प्रत्येकी दोन, तसेच अन्य तालुक्‍यांत प्रत्येकी एक व कऱ्हाड तालुक्‍यातील उंब्रज येथे एक कार्यालय आहे. या कार्यालयातून शासनाला दरमहा होणाऱ्या दस्त नोंदणीतून सुमारे 18 कोटींचा महसूल मिळतो.
 
22 मार्चपासून 12 मेपर्यंत कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहिल्याने या कार्यालयातून व्यवहार ठप्प झाले. पर्यायाने शासनाला त्याद्वारे मिळणारा महसूलही बंद झाला. त्यामुळे जिल्ह्यातून शासनाला मिळणाऱ्या महसूलला मोठा फटका बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी 12 मे पासून जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून कामकाज करण्याचे आदेश दिले.

मात्र, प्रत्यक्षात लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी नियमांमुळे लोक फारसे बाहेर पडले नाहीत. त्यामुळे दस्त नोंदणीचे जिल्ह्यातील मोजकेच व्यवहार झाले आहेत. त्यातही जिल्ह्यातील 15 पैकी अधिक महसूल देणारी पाच कार्यालये कंटेनमेंट झोनमुळे बंद राहिली. त्यात कऱ्हाड व सातारा येथील प्रत्येकी दोन, तसेच उंब्रज येथील एका कार्यालयाचा समावेश होता. 

18 मे पासून सातारा व कऱ्हाडचे दुय्यम निबंधक कार्यालयाही सुरू झाले; परंतु कोरोनाची धास्ती व लॉकडाउनमुळे दस्त नोंदणीसाठी लोक फारसे बाहेर पडत नसल्याने तेथेही मोजकेच दस्त नोंदणी झाली. त्यातही खरेदी, साठेखत व्यवहारासाठी अनेक जण जिल्ह्याबाहेरून येणार असल्याने व सध्या जिल्ह्याबाहेर जाण्यास व जिल्ह्यात येण्यास परवानगीचे सोपस्कार पार पाडावे लागत असल्याने अनेकांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील कामे मागे ठेवल्याचे दिसून येते. 

उंब्रज येथे अद्यापही कंटेनमेंट झोन असल्याने तेथील कार्यालय बंद आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यातील 14 कार्यालये सुरू असली, तरी अपेक्षित दस्त नोंदणी नसल्याने त्याचा महसुलावरही परिणाम होताना दिसतो. त्यामुळे प्रशासन या आव्हानाला कसे सामोरे जाणार याकडे लक्ष लागून आहे.

सातारा जिल्ह्यात 15 दुय्यम निबंधक कार्यालयांद्वारे दस्त नोंदणीचे व्यवहार चालतात. महिन्याला साधारण 17 ते 18 कोटी महसूल मिळतो. मात्र, लॉकडाउनमुळे कार्यालय बंद असल्याने हा महसूल मिळण्यास अडचणी आल्या आहेत. सध्या कार्यालये सुरू असली तरी दस्त नोंदणीचे प्रमाण कमी आहे.

डी. के. खांडेकर, 
सहजिल्हा निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com