मुंबईत अडकल्या साताऱ्याच्या 100 गाड्या; 'लालपरी'च्या काळजीने प्रवाशांच्या जीवाला घोर!

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांच्या मदतीसाठी सातारा जिल्ह्यातील दहा आगारांतून तब्बल 100 एसटी बस मुंबईकरांच्या सेवेत पाठवण्यात आल्या. सध्या शाळा- महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे गावोगावी पुन्हा एसटी सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मात्र, 100 बस मुंबईत अडकल्याने जवळपास 1200 फेऱ्या सुरू करताना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सेवा देताना मर्यादा पडत आहेत. या प्रश्‍नी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. 

ग्रामीण भागात कितीही वाहतुकीची साधने वाढली, तरीही अजूनही ग्रामीण भागात दळणवळणाचे एसटी हे मुख्य साधन आहे. कोरोना काळात एसटीची सेवा बंद झाली. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. वाहतुकीची साधनेच बंद झाल्याने अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्याचबरोबर वडाप व्यावसायिकांनीही दुप्पट भाडे केले. त्यामुळेही सामान्यांना आर्थिक फटका बसला. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल रेल्वेची सेवाही बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 100 बस मुंबईकरांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने नेल्या. त्यामुळे मुंबईकरांची सोय झाली. अलीकडेच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्याचबरोबर सध्या अनलॉकही झाल्याने जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. बऱ्यापैकी दळणवळणही वाढले. मात्र, ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू नव्हती. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ती सेवा सुरू करण्यासाठी आता एसटीच्या अधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. 

त्याअंतर्गत सध्या टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातीलही एसटीच्या फेऱ्या पूर्ववत वेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी उपलब्ध असलेल्या एसटी बस दुरुस्त करून त्या वापरण्यात येत आहेत. त्याचबरोबर अनेक बस डीप क्‍लीनिंग करूनही वापरल्या जात आहेत. एसटीच्या वाढवलेल्या फेऱ्यांची सेवा कालपासून सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील 100 एसटी बस मुंबईत अडकल्याने ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करताना अधिकाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत. मुंबईत 100 बस अडकल्यामुळे तब्बल 1200 फेऱ्या सुरू करताना अधिकाऱ्यांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या बस सातारा विभागाला मिळणे आवश्‍यक आहे. 

जिल्ह्यातील एसटीची स्थिती...

  • एकूण एसटी बस- 735 
  • माल वाहतूक करणाऱ्या बस- 40 
  • दररोजच्या प्रवासी फेऱ्या- 3600 
  • आठवड्यात वाढवलेल्या फेऱ्या- 800 
  • पूर्वीच्या फेऱ्या- सुमारे 5200 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com