राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

कऱ्हाड (जि. सातारा) : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा परिसरात 2012 व 2013 मध्ये सलग दोन वर्षे झालेल्या आंदोलन प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नोव्हेंबर 2012 रोजी आणि वाठार येथे नोव्हेंबर 2013 रोजी पाचवड फाटा येथे आंदोलन झाले होते. त्या दोन्ही आंदोलनाचे वेगवेगळे खटले दाखल होते. त्या खटल्यांचा निकाल आज अतिरिक्त जिल्हा न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी दिली. त्यातून माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 

शेट्टी व खोत यांच्यातर्फे बचाव पक्षाचे वकील म्हणून ॲड. संग्रामसिंह निकम यांनी काम पाहिले. वाठार येथे नोव्हेंबर 2012 मध्ये पुणे-बंगळूरू महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे वाहनांचे टायर पेटवून महामार्ग रोको आंदोलन झाले होते. पोलिसांनी त्याबाबत गुन्हे दाखल केले होते. हवालदार खलील इनामदार यांनी फिर्याद आहेत. त्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या चिथावणीखोर भाषण केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळेच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रस्त्यावर फेकले, असा पोलिसांचा निष्कर्ष होता. त्याशिवाय पोलिस वाहने, एसटी बस व अन्य खासगी दहा वाहनांवर दगडफेक केली होती. 

दगडफेकीत दोन पोलिस निरीक्षकांसह अन्य दोन अधिकारी, चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे नमूद होते. नोव्हेंबर 2013 रोजी पाचवड फाटा येथे ऊसदर प्रश्नी स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी वाठार येथे कुरुंदवाड आगाराच्या एसटीबसवर दगडफेक केली. त्यात चालक जखमी झाले होते. त्यांच्या फिर्यादीवरुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व इतर गुन्हे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यावर दाखल होते. दोन्ही खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. औटी यांच्यासमोर झाली. त्यात बचाव पक्षाच्यावतीने ॲड. संग्रामसिंह निकम यांनी युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्या. औटी यांनी प्रत्यक्ष घटनेवेळी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत उपस्थित नसल्याचे मत नोंदवत दोघांची या दोन्ही खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

शेतकऱ्यांसाठी आपण कर्तव्य म्हणून काम करणार 

बचाव पक्षाचे वकील ॲड. संग्रामसिंह निकम शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी जवळपास ४७ हून अधिक खटल्यांमध्ये शेतकरी नेते व कार्यकर्त्यांसाठी न्यायालयात कोणीतीही विनाशुल्क काम केले आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी आपण कर्तव्य म्हणून हे काम करणार असल्याचे ॲड. निकम यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com