गंभीर रुग्णांना इथं आणताय... मग हे नक्की वाचा

गंभीर रुग्णांना इथं आणताय... मग हे नक्की वाचा

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मागविलेले जादा व्हेंटिलेटर्स उपलब्ध न झाल्याने गंभीर कोरोनाबाधितांवर जिल्हा रुग्णालयातील पूर्वीच्याच सहा व्हेंटिलेटर्सद्वारे उपचार सुरू आहेत. त्यामुळे अन्य आजारांच्या
सर्वसामान्य रुग्णांची परवड होत असून, एखाद्या गंभीर रुग्णांचे आयुष्य त्यामुळे रामभरोसे राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात तातडीने जादा व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. 

कोरोनाची बाधा झाल्यावर हा विषाणू व्यक्तीच्या श्‍वसनयंत्रणेवर हल्ला करत असतो. श्‍वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. काहींना नैसर्गिक पद्धतीने श्‍वासही घेणे अशक्‍य होते. अशा परिस्थितीत गेलेल्या रुग्णांसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते, ती कृत्रिम श्‍वासोच्छवास देण्याची. तो देण्याचे काम व्हेंटिलेटरच्या माध्यमातून होत असते. श्‍वासोच्छवास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यावर रुग्णाला तातडीने व्हेंटिलेटरवर घेतले जाते. त्यामुळे कृत्रिम श्‍वासोच्छवास सुरू ठेवत त्याच्यावर उपचार करणे शक्‍य होते. आजार कमी झाल्यावर व्हेंटिलेटर काढला जातो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरची सर्वाधिक आवश्‍यकता असते. साधारपणे 15 ते 20 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलेटरवर घ्यावे लागत असल्याचे आजवरच्या एकंदर परिस्थितीमधून समोर आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील शंभर बेडच्या आयसोलेशन वॉर्डचा विचार करता आरोग्य विभागाने शासनाकडे आणखी 14 व्हेंटिलेटरर्सची मागणी केली आहे. ते तातडीने मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. सीएसआर फंडातूनही काही व्हेंटिलेटर्स उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. परंतु, त्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील गंभीर रुग्णांवरील हे उपचार केवळ पूर्वीच्या सहा व्हेंटिलेटर्सवरच अवलंबून आहेत. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामध्ये गंभीर रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्स अपुरे पडत आहेत. दररोज उपलब्ध असलेले सर्व व्हेंटिलेटर्स वापरात असतात. त्यामुळे अचानक एखादा कोरोनाबाधित रुग्ण अत्यवस्थ झाला तर, त्याला कृष्णा किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये हलवावे लागत आहे. 

प्राधान्य म्हणून कोरोनाबाधितांना व्हेंटिलेटर्सचा वापर होत आहे. परंतु, त्यामुळे अन्य आजाराच्या रुग्णांवर मात्र अन्याय सुरू आहे. विषारी औषध पिलेले, सर्पदंश, हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, गंभीर अपघात अशा विविध आजारांमध्ये
रुग्णाला व्हेंटिलेटर्सची तातडीने गरज असते. किंबहुना त्याचे जगणे किंवा मरणे हे व्हेंटिलेटर्सवरच अवलंबून असते. अनेक रुग्णांना अनेक दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते. परंतु, सध्याचे उपलब्ध व्हेंटिलेटर्स
कोरोनाबाधितांच्या उपचारामध्येच वापरले जात आहेत. त्यासाठीही काही वेळा कमतरता जाणवते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com