प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता

कऱ्हाड  शासनाने वर्षभरापूर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतलेल्या तलाठी संवर्गाची भरती प्रक्रीया राज्यातील अन्य जिल्ह्यांनी पूर्णत्वास नेली. मात्र, सातारा जिल्हा त्यास अपवाद ठरला आहे. सातारा जिल्ह्यात 114 जागांसाठी 30 हजारांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली असून, त्यांचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने अद्याप गुण यादीही प्रसिध्द न केल्याने उमेदवारांनीच माहिती अधिकाराचा वापर करत महापोर्टलकडून गुणयादी प्राप्त केली. राज्यातील 34 जिल्ह्यांत निकालानंतरची भरती प्रक्रीया अंतिम टप्प्यात असताना सातारा जिल्ह्यात त्यास विलंब का? याचे सर्वांना पडलेले कोडे सुटणार कधी ? त्यासाठी जिल्हा प्रशासन गती देणार का ? याकडे परिक्षार्थी उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा 

शासनाने मार्च 2019 कालावधीत जाहिरात प्रसिद्धी करुन महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी संवर्गासाठी अर्ज भरून घेतले. त्यानंतर जुलै 2019 कालावधीत त्यासाठी परीक्षा झाली. सातारा जिल्ह्यातील 114 जागांसाठी तीस हजारांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. सप्टेंबर 2019 मध्ये महापरीक्षा पोर्टलद्वारे त्याचा निकाल जाहीर केला. त्या- त्या जिल्ह्यांना त्यांच्या सर्व उमेदवारांची माहिती दिली. त्यानंतर बहुतेक सर्वच जिल्हा प्रशासनाकडून निवड यादी व कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निकाल जाहीर केला. त्यातील उमेदवारांना नियुक्तीही मिळाल्या आहेत. मात्र, सातारा जिल्हा प्रशासनाने भरती प्रक्रियेस दुय्यम महत्व दिल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. 

फेब्रुवारी 2020 मध्ये पुढील प्रक्रियेसंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु, त्याचे पालन केले गेले नाही. संबंधित उमेदवारांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला. अनेक वेळा प्रशसानाशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत युवा वर्गाने व्यक्त करीत आहे. निकालास विलंब होण्यामागे साताऱ्याला विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्रच असल्याच्या कारणासह दिवाळीनंतर निकाल लावला जाईल असे सांगण्यात आले. त्याशिवाय महापोर्टलबाबत शासनाने मार्गदर्शन मागवले आहे. अनूसूचित जमातीच्या उमेदवारांची भरती प्रक्रीया सुरू आहे, आरक्षणाबाबत शासकीय मार्गदर्शन मागवले असल्याची कारणे दिली जात असल्याचे सांगण्यात येते. नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर या प्रक्रीयेस गती मिळेल असे वाटत होते. मात्र, त्याबाबतही उमेदवारांच्या पदरी निराशा आली. वर्षभरापासून उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली. मात्र, जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांची मनस्थिती बिघडत चालली आहे
 
राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया पूर्ण केली जात असताना सातारा जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एक वर्ष होवूनही अद्याप काहीही हालचाल झाली नसल्याने उमेदवारांतही भिती व चिंतेचे वातावरण आहे. लागणाऱ्या विलंबामुळे प्रक्रीयेबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पारदर्शक प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. 

सातारा व धुळे जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. सर्व परीक्षार्थींचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवार चिंतेत आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाने भरती प्रक्रीया पूर्ण करावी, अशी मागणी परीक्षार्थी यांनी केली आहे.
 

"शासनाने नवीन भरती करू नये असे, निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे तलाठी संवर्गासाठीची भरती प्रक्रीया थांबवली आहे. अन्य जिल्ह्यांत ही प्रकीया राबवली असली तरी सातारा प्रशासनाने शासनाकडे त्यासंदर्भात मार्गदर्शन मागवले आहे.'' 

-सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com