कोरोना रोखण्यासाठी "झेडपी' सरसावली; गावपातळीवर केल्या "या' उपाययोजना

karad
karad

सातारा : ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषदेने गावपातळीवर कडक उपाययोजना करण्यासाठी नियमावली लागू केली आहे. यामध्ये गावात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवावी लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, खोकला व मधुमेह असलेल्यांची दररोज तपासणी करावी लागणार असून, त्यांना बाहेर जाण्यास मनाई करावयाची आहे. ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे का, याची दररोज तपासणीही केली जाणार आहे. यासाठी विस्तार अधिकारी दररोज एक ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी किमान दहा ग्रामपंचायती, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी किमान पाच ग्रामपंचायतींची दररोज पडताळणी करणार आहेत. 

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवर कडक उपाययोजना करण्याची सूचना पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी सर्व ग्रामपंचायतींना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक उपाययोजना लागू करण्याची सूचना केली आहे. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी होतेय का नाही, याचीदेखील विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दररोज पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरावा, विनामास्क बाहेर येणाऱ्यांवर दंड आकारावा. गावातील दुकानांसह सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक करावे. गावातून व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्यांची नोंद ठेऊन त्यांचीही नियमित तपासणी करावी. त्यांचा जाण्याचा मार्ग, कारण, प्रवासाचा मार्ग, याची माहिती घेऊन नोंद ठेवावी लागणार आहे, तसेच गावातून नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांचीही नोंदणी करायची आहे, तसेच बाहेर गावाहून गावात येणाऱ्यांची नोंद ठेवणे बंधनकारक असेल. 

सार्वजनिक कार्यक्रमात लग्न, अंत्यविधी, रक्षा विसर्जन, सभा, संमेलने यामध्ये सामाजिक अंतर व मास्क घालणे अनिवार्य करावे, त्यासाठी ग्राम समितीने लक्ष द्यावे. गावातील एखाद्या भागात कोरोनाच रुग्ण आढळल्यास तेथे प्रतिबंधित झोन तयार करणे. त्यासाठी पत्रे व बांबू लावून बंद करावा लागणार आहे. कोरोना रुग्णांशी निकट सहवासित असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करणे व त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे अथवा होम क्वारंटाइन करणे आदी बाबी समितीला कराव्या लागणार आहेत. याशिवास गावाच्या स्वच्छतेवर भर देऊन गटारांची स्वच्छता, गावात जंतूनाशक फवारणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणे, सांडपाणी व्यवस्था, डबके साठणार नाही याची काळजी गावाने घ्यावयाची आहे. 

या सर्वांची व्यवस्थित अंमलबजावणी होतेय का, हे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन करायची आहे. यासाठी विस्तार अधिकाऱ्याने दररोज एक ग्रामपंचायत, गटविकास अधिकाऱ्याने दररोज दहा ग्रामपंचायती, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी किमान पाच गावांची तपासणी करावयाची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने गावपातळीवर कोरोना रोखण्यासाठी कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याची अंमलबजावणी गावनिहाय सुरू झाली आहे. 


ज्येष्ठ नागरिकांची नियमित तपासणी... 
गावातील 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची दररोज नियमित तपासणी केली जाणार आहे. यामध्ये तापमान, पल्स रेट, ऑक्‍सिजन लेवलची तपासणी होईल. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका सतर्क राहून काम करायचे आहे, तसेच ताप, खोकला व मधुमेह असलेल्या लोकांची दरारोज तपासणी करून त्यांना बाहेर जाण्यास मनाई करावी. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com