
सातारा जिल्ह्यात १,७३९ गावांत सांडपाणी प्रकल्प
सातारा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर भर दिला आहे. या प्रकल्पांसाठी जिल्ह्यात पाच कोटींहून अधिक निधी मंजूर झाला असून, एक हजार ५५ गावांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून सद्य:स्थितीत २३४ गावांमध्ये प्रकल्पाचे काम सुरूही झाले आहे.
स्वच्छता अभियान, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त अभियानामध्ये सातारा जिल्ह्याची देशात ओळख निर्माण झाली. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारचे अभियान, उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, गावच्या समग्र स्वच्छतेत अजूनही ग्रामीण भागांमध्ये काही समस्या पुढे आल्या आहेत. या प्रकारचे आव्हान पार करण्यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्येच्या आतील एक हजार ७३९ गावांसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. एप्रिल २०२२ अखेर जिल्ह्यात विविध तालुक्यांना चार कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने हे काम सुरू असून २३४ हून अधिक ग्रामपंचायतींनी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. एक हजार ७८ गावांना तांत्रिक व एक हजार ५५ गावांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. ‘‘घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी सर्वच गावांनी पुढे येण्याची गरज आहे. पाणी व स्वच्छता विभागाकडून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हावासीयांनी हे अभियान यशस्वी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी केले आहे.
Web Title: Sewage Project In 1739 Village In Satara District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..