प्रशासन नुसतं हातावर हात ठेऊन बसलय? शंभूमहादेवाच्या भाविकांची भावना

प्रशासन नुसतं हातावर हात ठेऊन बसलय? शंभूमहादेवाच्या भाविकांची भावना

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री शंभूमहादेवाची वार्षिक चैत्र यात्रा 17 ते 27 एप्रिलदरम्यान आहे. यावर्षीही कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने यात्रा भरवण्याबाबत प्रशासनाने अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे भाविकांसह स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दर वर्षी यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली येथे सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त यात्रा नियोजन बैठक होते. 

महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांमध्ये शिंगणापूर यात्रेचा समावेश होतो. या यात्रेला महाराष्ट्रातील अगदी मराठवाडा, विदर्भासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातून भाविक दर्शनासाठी येतात. ही यात्रा चैत्र शुद्ध पंचमी ते पौर्णिमा या कालावधीत होते. या शिंगणापूर यात्रेसाठी सात ते आठ लाख भाविक येत असतात. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे देशभर पूर्णपणे लॉकडाउन असल्यामुळे प्रशासनाने बैठक घेऊन शिंगणापूर यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले होते; परंतु यावर्षीही आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढत असल्यामुळे 17 ते 27 एप्रिल या कालावधीत भरणारी शिंगणापूर यात्रा भरणार, की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रा, जत्रांसह गर्दीच्या कार्यक्रमांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. 

बगाड्यासह मानक-यांची पोलिसांच्या हातावर तुरी; 83 जणांना जामीन मंजूर

मात्र, येथील यात्रा 15 दिवसांवर आली तरी त्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला दिसत नाही. शिंगणापूर यात्रेदरम्यान मंदिर किती दिवस बंद राहणार, यात्रेतील शंभू महादेव हळदी समारंभ, लग्नसोहळा, ध्वज बांधणेचा सोहळा, कावडीसोहळा यासारखे धार्मिक कार्यक्रमांसाठी किती सेवाधारी, मानकरी भाविकांना परवानगी मिळणार, यात्रा कालावधी दरम्यान गावातील दुकाने सुरू राहणार का, यात्राकाळात कोणते निर्बंध लावले जाणार, लाखो भाविकांना थांबवण्यासाठी प्रशासन, ग्रामपंचायत, तसेच देवस्थान समितीच्या वतीने कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार की नाही याबाबतचे कोणतेही निर्णय स्थानिक प्रशासनाकडून अद्यापपर्यंत जाहीर केले गेले नाहीत. यात्रा 15 दिवसांवर आली असून, यात्रा भरवण्याबाबत लाखो भाविकांसह, यात्रेसाठी येणारे स्टॉलधारक, स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर यात्रा रद्द केल्यास लाखो भाविकांना थांबविण्यासाठी शिंगणापुरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करावी लागणार आहे, तसेच शिंगणापूर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्याची आवश्‍यकता आहे. मानकरी, भाविक हे गुढीपाडव्यापासून चालत निघतात. 

श्री शंभूमहादेवाच्या यात्रेसाठी मराठवाड्यासह, पुणे, नगर जिल्ह्यांतून येणारे प्रमुख मानकरी, भाविक हे गुढीपाडव्यापासून चालत निघतात. त्यामुळे या भाविकांना यात्रेच्या निर्णयाबाबत योग्य वेळेत निरोप जाणे आवश्‍यक आहे. तेव्हा शिंगणापूर यात्रेबाबत स्थानिक प्रशासकीय यंत्रणा कोणते निर्देश देणार? या प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाणून घ्या बनावट नाेटांचे क्रमांक, तुमच्याकडे त्याच क्रमांकाची नाेट असल्यास जरुर नजीकच्या पाेलिस स्टेशनला कळवा

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com