
नेर कालव्याद्वारे परिसरातील किमान अडीच हजार क्षेत्र ओलिताखाली येते. सध्या सर्व पिकांना पाण्याची गरज असून, तलावात मुबलक पाणी आहे. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही या कालव्याची डागडुजी केली जात नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
पुसेगाव (जि. सातारा) : नेर तलावातून पाणी सोडण्यासाठी असलेला कालवा पुसेगाव-सातारा रस्त्यालगत पुसेगाव हद्दीतील श्री. देशमुख यांच्या शेताजवळ फुटला आहे. या कालव्याच्या दुरुस्तीस दोन दिवसांत प्रारंभ न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.
नेर तलावातून पाणी सोडण्यासाठी असणारा कालवा तीन महिन्यांपूर्वी पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. परंतु, अद्याप त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. या कालव्याद्वारे परिसरातील किमान अडीच हजार क्षेत्र ओलिताखाली येते. सध्या सर्व पिकांना पाण्याची गरज असून, तलावात मुबलक पाणी आहे. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही या कालव्याची डागडुजी केली जात नाही. या डागडुजीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी परिस्थिती असूनही कोणतीच हालचाल होत नाही. गेल्या आठवड्यात पालकमंत्र्यांनी आदेश दिल्याने खटाव तालुक्याच्या दक्षिण भागातील काही क्षेत्र ओलिताखाली आले. परंतु, फुटलेल्या कॅनॉललगतचा भाग अजूनही वंचित आहे, असे जाधव म्हणाले.
पोलीस पाटलांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक : गृहमंत्री देशमुख
दरम्यान, येत्या दहा ते पंधरा दिवसांत सर्व पिकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे पिके नष्ट होण्याची शक्यता असल्याने दोन दिवसांत या कामाकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे. या वेळी पुसेगाव शहरप्रमुख आकाश जाधव व प्रताप जाधव यांनी कामाची पाहणी केली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे