

Sugarcane movement case hearing becomes a moment of reunion as veteran farmers’ leaders meet after years.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंध असताना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राज्यभर गाजलेली आंदोलने झाली. ऊसदर, वीज, पाणी, कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरलेली ही चळवळ शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनली. मात्र, काळाच्या ओघात संघटनेचे तीन गट झाले आणि त्याचा परिणाम आंदोलनाच्या धारेलाही बसला. मतभेद, आरोप-प्रत्यारोप, हेवेदावे यामुळे चळवळीत दुरावा निर्माण झाला. मात्र, आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील हे तिघे एकत्र आले. एकमेकांना पाहून त्या मंतरलेल्या दिवसाच्या आठवणींना उजाळा मिळाला.