परिचारिकांचे हाल थांबवा; सातारा जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवा

परिचारिकांचे हाल थांबवा; सातारा जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवा

सातारा : कोरोनाबाधितांना बेड मिळणे दुरापास्त झालेले असताना जिल्हा रुग्णालयातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिचारिका मेटाकुटीला आल्या आहेत. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला अनेकदा विनंत्या करूनही जादा मनुष्यबळ मिळत नसल्याने सध्या कार्यरत परिचारिका दररोजच्या कामाच्या वाढत्या ताणामुळे अक्षरशः बेजार झाल्या आहेत. परिचारिकांची संख्या कमी असल्याने प्रत्येक शिफ्टला तीन परिचारिकांची आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी एका परिचारिकेला संपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने तातडीने कृतिशील कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.
 
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. काल एकाच दिवसात तब्बल 921 जण कोरोनाबाधित निघाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 हजारांवर गेलेली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये आठ हजार 543 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील बहुतांश गंभीर रुग्णांचा भार हा जिल्हा रुग्णालयावर आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सात वॉर्ड व 20 बेडचे दोन अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. या वॉर्डमध्ये दररोज क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल असतात. रुग्णांची सोय होण्यासाठी आणखी बेड वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु आहेत त्याच बेडसाठी आवश्‍यक असलेले परिचारिकांचे मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने पुरवणे प्रशासनाला अद्याप शक्‍य झालेले नाही.

तर मुंबईचा विनाश होईल, समुद्रातील भरावास पर्यावरण प्रेमींचा विरोध
 
जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या कोरोनासाठी सात, तर नॉन कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी 13 विभाग कार्यरत आहेत. त्यासाठी एकूण परिचारिकांची मंजूर पद संख्या 186 आहे; परंतु त्यामधील विविध 21 पदे रिक्त आहेत, तर रजा व गैरहजर असलेले 17 जण आहेत. त्यामुळे केवळ 148 पदेच सध्या कामासाठी उपलब्ध आहेत. त्यातही परिसेविकेंची 17 पदे रिक्त असल्याने त्यांचा चार्ज अधिपरिचारिकांकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामासाठी परिचारिका आणखी कमी पडत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक वॉर्डसाठी दोन ते तीन परिचारिकांची आवश्‍यकता असते.

आता राज्यातील मराठा समाजाच्या नजरा उदयनराजेंकडे

त्याचबरोबर 20 बेडच्या आयसीयू वॉर्डसाठी तीन शिफ्टमध्ये मिळून कमीतकमी 30 परिचारिकांची आवश्‍यकता असते. संख्या कमी असल्याने प्रत्येक शिफ्टला तीन परिचारिकांची आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी एका परिचारिकेला संपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे एका शिफ्टमध्ये एका परिचारिकेला 40 रुग्णांची सेवा बजावावी लागत आहे. त्यातच कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तब्बल 19 परिचारिका कोरोनाबाधित आढळल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी आधीच कमी मनुष्य बळावर काम करणाऱ्या परिचारिकांवर कामाचा आणखी बोजा पडत आहे. सर्व रुग्णांवर योग्य उपचार करताना अनेकदा त्यांना शारीरिक क्रिया करण्यासाठीही पूर्ण शिफ्टमध्ये वेळ मिळत नाही, अशी परिस्थितीत निर्माण होत आहे. 

आश्‍वासने नको मनुष्यबळाची उपलब्धता करा 

परिचारिकांची ही विदारक अवस्था अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच पालकमंत्र्यांच्या समोरही मांडण्यात आली आहे; परंतु प्रत्येक वेळी आश्‍वासनाशिवाय काहीच हाताला लागले नाही. त्यामुळे परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या योद्‌ध्यांना सध्याच्या काळात जपणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासने न देता प्रत्यक्ष मनुष्यबळाची उपलब्धता तातडीने करणे आवश्‍यक आहे.

Edited By : Siddharth Latkar 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com