

Digital addiction in India
esakal
लेखक : सत्यजित हिंगे
गेल्या दशकात भारतात डिजिटल क्रांतीने अभूतपूर्व वेग घेतला आहे. स्वस्त इंटरनेट, स्मार्टफोनचा झपाट्याने वाढलेला प्रसार आणि सामाजिक माध्यमांचे आकर्षण यामुळे भारतीय समाजाच्या जीवनशैलीत मोठे परिवर्तन घडले आहे. संवाद, शिक्षण, मनोरंजन, व्यापार आणि प्रशासन या सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने नवी दारे उघडली आहेत. परंतु या परिवर्तनासोबतच एक गंभीर सामाजिक समस्या वेगाने पुढे येत आहे, ती म्हणजे डिजिटल व्यसन.
आज भारत हा जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक देश बनला आहे. ग्रामीण भागातही स्मार्टफोन आणि इंटरनेट सहज उपलब्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग, लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि सततची ऑनलाइन उपस्थिती यामुळे अनेक युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साधनांवर अतिनिर्भरता वाढताना दिसते. दिवसातील मोठा वेळ मोबाईल स्क्रीनकडे पाहण्यात जात असल्याने मानसिक आरोग्य, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक संबंध यांवर प्रतिकूल परिणाम होत आहेत.