

Racism in India
sakal
‘एक देश, अनेक संस्कृती’ ही भारताची ओळख केवळ घोषणांपुरती मर्यादित राहते आहे की काय, असा अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा एकदा उत्तराखंडमधील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांवरील वांशिक हल्ल्यांमुळे उभा राहिला आहे. शिक्षणासाठी घरदार सोडून, स्वप्नांच्या ओंजळी घेऊन आलेल्या तरुण-तरुणींना परक्या भूमीवर परके ठरवले जाणे हे केवळ कायदा-सुव्यवस्थेचे अपयश नाही, तर भारतीय समाजाच्या नैतिक अधःपतनाचे द्योतक आहे.
उत्तराखंडमधील विविध शहरांत ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर झालेल्या छळ, अपमान, मारहाण आणि वांशिक शिवीगाळीच्या घटना हे एखाद-दोन अपवाद नसून, त्या भारतातील खोलवर रुजलेल्या जातीय व सांस्कृतिक पूर्वग्रहांचे विदारक प्रतिबिंब आहेत. चेहऱ्याची रचना, भाषा, अन्नसंस्कृती किंवा पेहराव यांवरून एखाद्याची ‘भारतीयत्वाची पातळी’ ठरवली जाणे ही मानसिकता अत्यंत धोकादायक आहे.