'भूक कशी लॉकडाउन करणार?'...शेवटी 'त्यांनी' रिक्षाचे टायर विकून भागला घरखर्च!

Auto-Rickshaw-.jpg
Auto-Rickshaw-.jpg

नाशिक :  घरखर्च भागविण्यासाठी रिक्षाचे टायर विकले आणि घरात किराणा आणण्याचा आयुष्यातला सर्वांत वाईट प्रसंग बेतला आहे रिक्षाचालक नईम कोकणी यांच्यावर...कोरोनामुळे चार वेळा वाढलेला लॉकडाउन यात भुक कशी लॉकडाउन होणार?..घरात लेकरांच्या पोटाला दोन घास तर हवेच ना...लॉकडाउनमुळे गल्लीबोळांत सहज शिरू शकणाऱ्या रिक्षाची चाके जागेवरच थांबल्याने रिक्षावाल्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आयुष्यातला हा सर्वांत वाईट प्रसंग

कुटुंबाचा गाडा सुरळीत सुरू राहण्यासाठी त्यापैकी अनेकांनी रिक्षा व्यवसायाला रामराम ठोकत अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. काहींनी रिक्षा विकायला काढल्या, तर काहींनी रिक्षाचे टायर विकून घरखर्च भागवला. काही रिक्षाचालकांनी भाजीपाल्यासह फळविक्रीला सुरवात केली. शहरामध्ये एक हजारपेक्षा जास्त रिक्षाचालक वर्दी म्हणजे शाळकरी मुलांना शाळेत ने-आण करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शाळा बंदच असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालवली तरच घरखर्च भागणार आहे. उसने पैसे घेऊन एकदा किराणा माल आणला. मात्र लॉकडाउन वाढतच चालल्याने घरखर्च भागविण्यासाठी रिक्षाचे टायर विकले आणि घरात किराणा आणण्याचा आयुष्यातला सर्वांत वाईट प्रसंग बेतला आहे रिक्षाचालक नईम कोकणी यांच्यावर. 

रिक्षाच्या रचनेत केला बदल

लॉकडाउन झाल्यापासून प्रादेशिक परिवहन विभागाने व्यावसायिक वाहनांना बंदी घातली. त्यामुळे मोठ्या व अवजड वाहनांबरोबरच शहराच्या गल्लीबोळांत सहज शिरू शकणाऱ्या रिक्षाची चाकेही जागेवरच थांबली. मात्र जगणे केवळ रिक्षावरच अवलंबून असल्याने यापैकी अनेकांनी पारंपरिक रिक्षांच्या रचनेत बदल करत मागील बाजू ट्रेसारखी मोकळी करत त्याठिकाणी भाजी व फळे विक्रीस सुरवात केली. 

ईदसाठी पंधरा रुपयांचा रुमालही नाही 

लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंब जगवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे. घरातले सर्वकाही संपले आहे. घरातही बसू शकत नाही आणि बाहेरही जाता येत नाही, अशी बिकट अवस्था झाली आहे. रिक्षा विकायची म्हटली, तर आताच्या परिस्थितीत कोणी घ्यायलाही तयार होत नाही. पैसे नसल्यामुळे रमजान ईदसाठी साधा पंधरा रुपयांचा नवीन रुमालही घेता आला नाही, अशी खंत रिक्षाचालक अलीम शेख यांनी व्यक्त केली.

 जिल्हाभरात अठरा हजार, तर शहर परिसरात दहा ते बारा हजार रिक्षाचालक रिक्षाद्वारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. परंतु कोरोनामुळे व्यवसाय बंदच असल्याने अनेकांना बायकोचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली, तर काहींनी थेट रिक्षाच विकली. - भगवंत पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष, श्रमिक सेना 

रिक्षा बंद असल्याने घरात येणारे चलन बंद झाले आहे. पर्यायी व्यवसाय म्हणून भाजीपाला विक्री सुरू केली. तर आता त्यातही जागोजागी भाजीविक्री करणाऱ्यांशी स्पर्धा करावी लागते. तीन लहान मुले आहेत. मुलांचे पालनपोषण कसे करायचे, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, उदरनिर्वाह कसा करायचा, असे प्रश्‍न आहेत. - देवीदास उमरे, रिक्षाचालक 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com