
नाशिक : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या आणि पात्र असूनही शेतकऱ्यांना पुरेशा निधीअभावी मागील काळात कर्ज वाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत. कर्ज वाटपाच्या विशेष मोहिमेद्वारे जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी दिलेले पीककर्ज वाटपाचे ४३७ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेची कर्जवाटपाची विशेष मोहिम
राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला निधी दिला आहे. ही रक्कम जिल्हा बँकेच्या एक लाख तीन हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली आहे, असे सांगून श्री. आहेर म्हणाले, की जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकेने नियोजन केले आहे.
सामोपचार कर्ज परतफेड योजना जाहीर
आजपर्यंत जिल्हा बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना जाहीर केली आहे. या योजनेत थकबाकीदारांसाठी सवलत देऊ केली आहे. त्यामुळे अधिक थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करावे. योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कम देखील बँक कर्ज वाटपासाठी करणार आहे.
पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कर्ज वाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. - केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.