देवानं दारं उघडली अन् पोट भरायचा मार्ग बी गावला! पाच हजार लोककलावंतांना रोजगार

Jagran Gondhala provides employment to five thousand folk artists
Jagran Gondhala provides employment to five thousand folk artists

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना महामारीने सगळ्या जगाला वेठीस धरले आहे. आजार पसरु नये म्हणून  सर्वत्र लॉकडाऊन केल्याने कित्येकांचं हातावर चालणार पोट भरणं अवघड होऊन बसले होते. दरम्यान लोककलावंताची देखील उदरनिर्वाहणासाठी फरफट होत होती. पण आता देवाची दारे उघडल्याने जागरण गोंधळासह दिवट्या-बुधल्यांचे कार्यक्रम जोमाने सुरू झाले आहेत. त्यामुळे कसमादेसह जिल्ह्यातील पाच हजार कलावंतांना रोजगार मिळाला आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून बेरोजगार झालेल्या या कलावंतांना दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नसोहळ्यांची सर्वत्र धूम असून, जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. 

कोरोनामुळे लोककलावंतांंना फटका

जागरण गोंधळ करणाऱ्या कलावंतांना वाघ्या-मुरळी म्हणून संबोधले जाते. श्री खंडेराव महाराजांचा, तसेच देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम केला जातो. कसमादेत या कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. लग्नसोहळे होणाऱ्या कुटुंबात लग्नाआधी जागरण गोंधळाचा कार्यक्रम हमखास होतो. ग्रामीण भागात बहुतांशी गावात वाघ्या-मुरळी आहेत. नाशिक शहरासह मोठ्या गावांमध्ये ग्रामीण भागातून गोंधळींना कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जाते. हजारो वर्षांची ही लोककला जागरण गोंधळ करणाऱ्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने जोपासली आहे. कोरोनामुळे मंदिरे व धार्मिक कार्यक्रम बंद होते. याचा फटका लोककलावंतांना मोठ्या प्रमाणावर बसला. कोरोना काळात मिळेल ते काम करत कलावंतांनी गुजरण केली. 

लग्नसोहळे सुरु झाल्याने रोजगार

मंदिरे उघडल्यानंतर लग्नसोहळ्यांनाही धूमधडाक्यात सुरवात झाली आहे. त्यामुळे जागरण गोंधळ कार्यक्रमांचीही रेलचेल आहे. परिणामी, या कलावंतांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पाच ते सहा कलावंतांचा एक गट असतो. यात पुरुषांना वाघ्या, तर महिला कलावंताला मुरळी म्हटले जाते. काही कुटुंबीय चंदनपुरीत श्री खंडेराव महाराज मंदिर परिसरात जागरण गोंधळ करतात. देव-देवतांच्या ठिकाणी अशा कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते. बहुतेक कुटुंबीय घरीच रात्री हा कार्यक्रम करतात. कलावंत रात्रभरात जागरण गोंधळ, देवाची कथा, देवीची गाणे, देवाची गाणे व मनोरंजन करतात. रात्रभराच्या कार्यक्रमासाठी सात ते दहा हजार रुपये घेतले जातात. दिवसा तासाभरासाठी या कार्यक्रमाला पाचशे ते हजार रुपये आकारले जातात. तळी भरण्यासाठी ५१, तर कोटम भरण्यासाठी १५१ ते २०१ रुपये कलावंतांना मिळतात. 
 

कोरोनामुळे कलावंतांसाठी नऊ महिने हलाखीचे गेले. शासनाने वाघ्या-मुरळींना अनुदान दिले पाहिजे. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच लोककलेचा प्रसार करणाऱ्या सामान्य कुटुंबातील कलावंतांचे प्रश्‍न लोकप्रतिनिधींनी अग्रक्रमाने सोडवावेत. 
-देवा खैरनार, 
वाघ्या-मुरळी परीक्षक 
मालेगाव तालुकाध्यक्ष 


लग्नापेक्षा दिवट्या-बुधल्यांना पसंती 

ग्रामीण भागात लग्नापेक्षा दिवट्या-बुधल्यांना प्राधान्य दिले जाते. देवाला पुरणपोळी, भरीत-भाकरी व मेथीची भाजी, भाकरीचा नैवेद्य दिला जातो. कसमादेतील ९० टक्के कुटुंबीय पुरणपोळीबरोबरच सामीष जेवण तयार करतात. चंदनपुरीतही प्रत्येक रविवारी अशा कार्यक्रमांची धूम असते. मटणाच्या जेवणामुळे नातेवाईक व निमंत्रित या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com