लगीन घटिका समीप आली...करा हो लगीन घाई!...पण, अनुरुप जोडीदार मिळेना...

marriage age increase.jpg
marriage age increase.jpg

नाशिक : (देवळा) शिक्षण, नोकरी, पुन्हा उच्च शिक्षण यात वय पुढे सरकत जाते. लग्नाचा विषय पुढे आला कि नोकरदार वर-वधू ची अपेक्षा... यामुळे आता मुला- मुलींची लग्ने उशिरा होत असल्याचे चित्र पुढे येत आहे. अनुरूप जोडीदार मिळण्याच्या प्रतीक्षेत विवाहास विलंब होत असल्याने लग्नाचे वय आता वाढले आहे. 

बापाची व मुलीची इच्छा नोकरदार जावई व पती मिळावा

उच्च शिक्षण व जॉब यामुळे आता वय सहज सत्तावीस -अठ्ठावीस पार करते. काही वेळा वर-वधू यातील वयाचा फरक आड येतो आणि मग आणखी अडचणीत वाढ होते. यामुळे आता वर-वधूंच्या लग्नाचे वय वाढले असल्याचे दिसून येत आहे. अलीकडे नवीन सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण तसे कमीच असल्याने उपवर नोकरदार मिळणे अवघड झाले आहे. परंतु, प्रत्येक बापाची व मुलीची इच्छा नोकरदार जावई व पती मिळावा अशी असल्याने तशी शोधमोहीम करता करता मुलींचे वय वाढत राहते. त्यात आता मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, चांगली नोकरी असलेला वर मिळावा यासाठी आग्रह असतो. परंतु, यामुळे काही चांगली स्थळे हातची निघून जातात. त्यात सध्या सरकारी नोकऱ्यांची संख्या त्यामानाने कमीच आहे. 

नोकरीवाला हवा, शेती हवी पण शेतकरी नको, स्वतःचे घरदार हवे...

खाजगी जॉब असणाऱ्या नोकऱ्या असल्या तरी त्यात अस्थिरता असल्याने मंडळी साशंक असते. शिक्षण आहे पण नोकरी नाही अशी गत उपवर नवरोबांची असल्याने त्यांना मुलगी कुणी देत नाही अन् मुलींना नोकरीवाला मुलगा मिळत नाही. असा विरोधाभास निर्माण झाल्याने विवाह संस्थांपुढेही हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बदलत्या परिस्थितीकडे सजगतेने पाहण्याची गरज आहे. खरे तर मुलीचे लग्नाचे वय हे जास्तीत जास्त 24-25 आहे. परंतु, नोकरीवाला हवा, शेती हवी पण शेतकरी नको, स्वतःचे घरदार हवे या अट्टहासात मुलींचे वय वाढत जाते. उशिरा लग्न झाले तर काही वेळा मातृत्वाचा प्रश्न असतो. शिवाय बाळाचे उशिरा आगमन, त्यांचे संगोपन, शिक्षण, गुंतवणूक असे सारेच प्रश्न निर्माण होतात. ग्रामीण भागातील मुलींचे विवाह 22 -23 व्या वर्षी आटोपत असले तरी शहरात मात्र, लग्नाचे वय वाढले आहे. 

सध्या उपवर मुलींची नोंदणी जास्त असून त्यांच्या अपेक्षा अधिक आहेत. सामाजिक स्थिरतेसाठी पालकांनी व मुलींनी सरकारी नोकरीवाल्याचा हट्ट सोडून कर्तृत्ववान, निर्व्यसनी, व्यावसायिक वा उद्योगशील उपवर वरांनाही प्राधान्य देण्याची गरज आहे. उशीर झाला कि मग अडचणी वाढतात. - हेमंत पगार, मराठा शुभलग्न वधुवर डॉट कॉम, नाशिक

गेल्या 8-10 वर्षांचा विचार केला तर वयाच्या 21-22 व्या वर्षी मुलींची व 24-25 व्या वर्षी मुलांची लग्ने होत असत परंतु, आता शिक्षण, नोकरी, जॉब, नोकरी असणाऱ्या वराचा शोध यात मुलींचे वय सहज 26-27 होऊन जाते. काही समाजात मुलींना नोकरी आहे तर मुलांना नाहीत अशी गत आहे. मुलीच्या विवाहास विलंब हे पालकांना एक टेन्शनच असते. परंतु. बदलत्या काळात हा वयाचा टप्पा बदलत आहे, हे मात्र नक्की.   - यादवराव सावंत, श्रीरामपूर ता. देवळा

मुलींची लग्ने तिशीच्या आत होणे हे तिच्या मातृत्वाच्या व पुढील कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तिशीनंतर काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. - डॉ. प्रशांत निकम, देवळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com