पेठ (जि. नाशिक) : शहारात एकाच रात्रीत तब्बल बारा ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, यात लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सहा घरमालक गावी गेल्याने त्यांची किती रुपयांची चोरी झाली, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
चोरट्यांचा आदिवासी दुर्गम भागाकडे मोर्चा
याबाबत माहिती अशी, की २३ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास सुलभानगर, सप्तशृंगीनगर येथे एकाच रात्री १२ घरांची कुलूप कटरच्या सहाय्याने कापून चोरी करण्यात आली. चोरी करताना चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांच्या बाहेरून कडी लावून घेतलेल्या होत्या. १५ ते २० जणांच्या सराईत टोळीने चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट घेणारे पथक शहरात दाखल झाले आहे.
पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
या वसाहतीत राहणारे बहुंताशी सरकारी नोकरदार, शिक्षक असल्याने लाखोंचा ऐवज गेल्याचे फिर्यादी हेमराज तुकाराम मानभाव (वय ३७) यांनी सांगितले. मानभाव हे बोरीची बारी येथील आपल्या जन्मगावी कार्यक्रमानिमित्त २३ तारखेला गेले होते. बुधवारी (ता. २४) सकाळी ते पेठला आले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, सुमारे ३१ हजार रुपये रोख लंपास केले. अजून ११ घरांची शहानिशा होणे बाकी आहे. घरमालक आल्यानंतरच किती रुपयांची लूट झाली, हे समजणार आहे. मात्र, चोरट्यांनी आपला मोर्चा आदिवासी दुर्गम भागाकडे वळविल्याने दुकानदार, व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिकांबरोबरच टपरीधारक, नोकरदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शेख, जाडर, शिपाई भोये तपास करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.