
नाशिक : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या कांद्याचे भाव वाढण्याचे नाव नाही. त्यामुळे रमजान ईदनंतर सिंगापूर, मलेशियासह आखाती देशांची मागणी कशी राहील, यासंबंधीची प्रतीक्षा कांदा निर्यातदारांची आहे. मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगालमधील कांद्यामुळे उन्हाळ कांद्याचा उठाव होईना. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये सरासरी 450 ते 650 रुपये क्विंटल भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
दोनशे कंटेनरऐवजी एवढाच कंटेनरभर कांदा निर्यात
जागतिक बाजारपेठेत ग्राहक नसल्याने शेतकरी कांद्याची आवक नियंत्रणात आणतील, अशी अटकळ निर्यातदारांची होती. प्रत्यक्षात मात्र आणखी भावात घसरण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू ठेवली आहे. त्याचवेळी जागतिक बाजारपेठेतील आयातदारांनी शिल्लक कांद्यामुळे नवीन खरेदीसाठीची उत्सुकता दाखविलेली नाही. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळत आहेत. पाकिस्तानमधून नवीन कांदा 31 मेपर्यंत जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होणार नाही. मात्र त्यानंतरही भारतीय कांदा स्वस्त मिळत राहिल्यास पाकिस्तानच्या कांद्याला गिऱ्हाईक शोधावे लागणार आहेत. आयातदारांकडून फारशी मागणी नसल्याने मुंबईच्या बंदरातून जाणाऱ्या जहाजांमध्ये दोनशे कंटेनरऐवजी पन्नास ते साठ कंटेनरभर कांदा निर्यात होत आहे.
पहिली रेल्वे बांगलादेशमध्ये पोचली
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाळीस टन क्षमतेचा एक डबा याप्रमाणे 42 डब्यांची रेल्वेगाडी नाशिकहून सोडण्यात येत आहे. निर्यातदारांच्या माहितीनुसार आतापर्यंत पाच हजार 40 टन कांदा बांगलादेशकडे रवाना झाला असून, पहिली रेल्वेगाडी कांदा घेऊन बांगलादेशमध्ये पोचली आहे. प्रत्यक्षात मात्र नाशिकहून रोज तीस ते चाळीस ट्रकभर कांदा बांगलादेशकडे रवाना व्हायचा. एका ट्रकमध्ये वीस टन कांदा बसतो. सीमा बंद झाल्यापासूनचा विचार करता, रस्त्यापेक्षा रेल्वेने रवाना झालेल्या कांद्याचे प्रमाण दहा टक्के इतके आहे.
कांद्याचे बाजारभाव (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)
बाजारपेठ आजचा भाव 5 मेचा भाव
कळवण 600 750
नांदगाव 450 251
देवळा 550 700
पिंपळगाव 651 625
नाशिक रोडहून कांदा निर्यात
नाशिक रोड रेल्वे मालधक्का येथून पन्नास ट्रक कांदा रेल्वेने बांगलादेशसाठी रवाना झाला. मंगळवारी (ता. 12) दिवसभर रेल्वे बोगीमध्ये कांदा लोड करण्याचे काम सुरू होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खेरवाडी (निफाड) येथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने बांगलादेशला रेल्वेने होणारी कांदा निर्यात थांबली होती. खासदार डॉ. भारती पवार व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेली मध्यस्थीही अयशस्वी ठरली होती. त्यावर तोडगा म्हणून नाशिक रोडहून कांदा निर्यात होत आहे. मंगळवारी कांद्याचे 50 ट्रक नाशिक रोड मालधक्का येथे आले. रात्री उशिरापर्यंत कांदा मालगाडीत भरण्याचे काम सुरू होते. बांगलादेशातील दरसाना, बेनापोल आणि रोहनपूर स्थानकांत हा कांदा पोचतो. रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे हा कांदा फुटुहा, डानकुनी, चांगसारी, मालदा टाऊन, चितपूर आदी स्थानकांवर पाठविण्यासाठी लोड केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.