जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे; नागरिकांत प्रचंड संताप

satana.jpg
satana.jpg
Updated on

नाशिक : (सटाणा) पालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम हाती घेऊन सर्व रस्ते खोदून ठेवल्याने नववसाहतींमधील शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. पावसाची रिपरिप आणि जलवाहिनीच्या कामांमुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

रस्ते खोदून ठेवल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर थेट पुनंद (ता. कळवण) येथून शहरापर्यंत जलवाहिनी टाकली. मात्र त्यानंतर ऐन पावसाळ्यात पालिका प्रशासनाने अभिमन्यूनगर, क्रांतीनगर, परशुराम कॉलनी, पाठक मैदान, सन्मित्र हाउसिंग सोसायटी या नववसाहतींमधील चांगल्या अवस्थेतील रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांसह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्ते खोदण्याचे काम करण्याचे कारणच काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

स्थानिक नागरिकांकडून निवेदन

नगर परिषदेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या नववसाहतींमध्ये सोयी-सुविधा पुरविण्यास पालिका प्रशासनाने नेहमीच टाळाटाळ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या रस्त्यांवर तातडीने मुरूम टाकून दुरुस्ती करावी आणि रस्ता रहदारीयोग्य करावा, अशी मागणी विजय वाघ, भालचंद्र कोठावदे, शरद नंदाळे, काशीनाथ सूर्यवंशी, प्रशांत कोठावदे, रतिलाल बागूल, आर. जे. शिवदे, एम. डी. लांडगे आदींसह स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. 

ठेकेदार-प्रशासनाची टोलवाटोलवी 

स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे चिखलमुक्त रस्त्यासाठी मुरूम टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित ठेकेदाराला मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता, रस्ता दुरुस्तीबाबत प्रशासनाशी असे कोणतेही बोलणे झाले नाही, असे सांगून रस्त्यावर मुरूम टाकण्यास नकार दिला. पालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या टोलवाटोलवीमुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी पुनंद पाणीयोजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम आणि भुयारी गटार योजना ही महत्त्वाकांक्षी कामे प्राधान्यक्रमाने होणार आहेत. त्यानंतर सर्वच रस्त्यांची कामे होतील. तोपर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. - सुनील मोरे, नगराध्यक्ष 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com