कांदा खाणार पुन्हा भाव! चाळीतील कांद्याला खरीप नुकसानीचा होणार लाभ? कसे ते वाचा

onion-2-6410.jpg
onion-2-6410.jpg

नाशिक : कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील 'अर्ली' खरीप कांद्याचे पावसामुळे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. याखेरीज पावसाने रोपवाटिकांचे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान केल्याने खरीप कांद्याच्या उत्पादनात घट ठरलेली आहे. या दोन्ही प्रकारच्या नुकसानीमुळे चाळीतील उन्हाळ कांद्याला आधार मिळाला आहे. 

एकरामागे बियाण्यांचा भाव पोचला १२ हजारांपर्यंत

चाळीत ४० ते ४५ लाख टनांहून अधिक उन्हाळ कांदा आहे. याखेरीज गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी कांदा शिल्लक ठेवला नाही आणि कंपन्यांच्या बीजोत्पादनात निम्म्याने घट झाली. परिणामी, आगामी उन्हाळ कांद्यासाठी शेतकऱ्यांचा एकराचा बियाण्याचा खर्च १२ हजारांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे ५०० ते एक हजार रुपये किलो भावाने बियाणे विकले गेले. आता दोन ते तीन हजार रुपये किलो भावाने शेतकऱ्यांना बियाणे विकत घ्यावे लागत आहे. एकराला सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार किलो बियाणे लागते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन देशभर घेतले जाते. त्यात महाराष्ट्राच्या जोडीला बिहार, हरियाना, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांचा समावेश होता. 

भाव मिळण्याबाबत होती साशंकता

नोव्हेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाळ कांद्याची लागवड होते. हा कांदा एप्रिल ते जूनमध्ये बाजारात विक्रीसाठी येतो. हा कांदा चाळीमध्ये साठविला जात असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत खाण्यासाठी पुरेसा ठरतो. देशाच्या गरजेपेक्षा अधिक उन्हाळ कांद्याचे उत्पादन झाले आहे. अजूनही खरीप कांदा बाजारात येईपर्यंत देशाला ३० लाख टनांपर्यंत कांदा पुरेसा ठरणार आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक कांदा शिल्लक असल्याने त्याला कितपत भाव मिळेल, अशी साशंकता होती. 

उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ ठरलेलीच

'लेट' खरीप अर्थात, रांगड्या कांद्याची लागवड खरिपातील पिके काढल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू होते. हा कांदा जानेवारी ते मार्चमध्ये बाजारात विक्रीसाठी येतो. खरिपामध्ये ४० लाख टनांपर्यंत उत्पादन अपेक्षित असते. पावसाच्या दुहेरी नुकसानीमुळे १५ ते २० लाख टनांपर्यंत खरिपाचे उत्पादन अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी भावाला प्राधान्य देत उन्हाळ कांद्याकडे लक्ष केंद्रित केल्यास रांगड्या कांद्याच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप कांद्याचे एकरी ५० ते ६०, रांगड्याचे ७० ते ८० आणि उन्हाळ कांद्याचे १२० ते १४० क्विंटल उत्पादन मिळते. उन्हाळ कांद्याच्या बियाण्यासाठी दुप्पट ते तिपटीने खर्च झाल्याने यंदाच्या उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ ठरलेली आहे. 

खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे महत्त्वाचे 

उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घरी बियाणे तयार करायला हवे. आजवरची स्थिती पाहता, बाजारात चांगला भाव मिळायला लागला, की शेतकरी बियाण्यासाठी कांदा शिल्लक ठेवत नाही असे दिसून आले आहे. अशातच, निसर्गाच्या प्रतिसादाअभावी रोपवाटिकांचे नुकसान होते. हा विचित्र खेळ नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com