धुळे- एकीकडे उन्हाचे चटके सुरू झाले असतानाच महावितरण कंपनीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सरकारी कार्यालयांसह दिवाबत्ती, पाणीपुरवठा आणि विविध कारणांमुळे थकीत ४९६ कोटी १२ लाखांच्या वीजबिल वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांभोवती वसुलीचे पाश आवळले आहेत. अन्यथा, संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा मुख्य अभियंत्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ग्राहकांनी चालू महिन्याच्या देयकासह सर्व थकित बिलाचा भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित होण्याची अप्रिय कार्यवाही टाळावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.