जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा खोटा असून, त्यांनीच न्यायालयाची फसवणूक केल्याने कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सुरेश जैन हेदखील भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, 'खडसे यांनी त्यांच्यावरील कारवाईच्या मागे मंत्री असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे गिरीश महाजन हे एकमेव मंत्री आहेत. मात्र, या प्रकरणात आपण महाजन यांच्याकडून एक कागदही घेतलेला नाही. उलट महाजन व माजी मंत्री सुरेश जैन हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्याविरुद्धही आपला लढा सुरू आहे. महाजन यांनी जळगावातील एसटी महामंडळाच्या जमिनीच्या व्यवहारात बिल्डर खटोड यांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार केला आहे. यात त्यांच्या पत्नी साधना महाजन, तसेच रोहिणी खडसे यांचेही प्लॉट आहेत.'' या पत्रकार परिषदेला गजानन मालपुरे, रोहिणी राऊत आदी उपस्थित होते.
दहा भुजबळ, खडसे यांना पुरेन
ओबीसी समाजाच्या नेतृत्वात खडसे व छगन भुजबळ एकत्र येत असल्याबद्दल त्या म्हणाल्या, की आपण भुजबळांविरुद्धही लढाई केली आहे. या दोन्ही नेत्यांचे अस्तित्व आता संपत आले आहे, त्यामुळे आता ते एकत्र येत आहेत. परंतु असे दहा खडसे आणि भुजबळ एकत्र आले, तरी त्यांना आपण पुरून उरणार आहोत.
दमानिया म्हणाल्या,
- खडसे यांना घाबरून "क्लीन चिट' दिली आहे.
- जळगावात पक्ष वाचविण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
- फडणवीस खडसे यांना घाबरतात
|