ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं डावपेच, ते कोणते ? वाचा सविस्तर

 ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं डावपेच, ते कोणते ? वाचा सविस्तर

शहादा : तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी युवावर्गाच्या पुढाकार वाढल्याने प्रस्थापितांच्या प्रतिष्ठेची कस लागणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने गटातटाचे राजकारण व उमेदवारांची जुळवाजुळव करुन नामांकन दाखल करणे सुरु झाले असले तरी प्रतिस्पर्धी गटाला तगडा उमेदवार मिळू नये यासाठीही डावपेच आपल्या जात आहे.

आवश्य वाचा- उमेदवारीसाठी जातीय समीकरणांवरच अधिक भर 

तालुक्यातील मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होणार आहे. त्यानंतरच सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर करून इच्छुक सरपंच पदाच्या दावेदार उमेदवारांच्या या निर्णयामुळे चांगला हिरमोड झाला आहे. सरपंचपद आपल्याकडे जमा व्हावे यासाठी आरक्षणानुसार प्रत्येक प्रवर्गाच्या तगडा उमेदवार आपल्याच पॅनल मध्ये राहावा यासाठी बैठका, चर्चा, मनधरणी सुरू आहे. त्यामुळे गाव गाडा चालवण्यासाठी इच्छुक असणारे पुढारी आरक्षणाचे पुढील समीकरण बघूनच विश्वसनीय सदस्यांना आपल्या पॅनल मध्ये स्थान देऊन उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

खर्च तर करावाच लागेल ?
सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या पॅनल प्रमुखाला आपल्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांत पासून तर चहा पाण्यापर्यंत सर्वच खर्च करावा लागतो यावर्षी निवडणुकीनंतरच सरपंच पदाचे आरक्षण निघणार असल्याने निवडुन आलेल्या उमेदवारांच्या खर्च कुठपर्यंत करायचा या विवंचनेत पॅनल प्रमुख आहे कारण निवडून आल्यानंतरही ही प्रत्यक्ष सरपंचपदासाठी मतदान होत नाही तोवर सगळ्यांनाच या पॅनल प्रमुखांना सांभाळावे लागणार आहे त्यामुळे यावर्षी गावगाडा सांभाळण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची शासनाच्या त्या निर्णयामुळे मात्र तारेवरची कसरत होत आहे.

राजकीय पक्ष सरसावले
दरम्यान ग्रामीण भागात आपल्या पक्षाची पकड मजबूत होऊन कार्यकर्त्यांचे जाळे विणले जावे, यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज करण्यासाठी सरसावले आहेत. यासाठी अधिकाधिक ग्रामपंचायती कशा जिंकता येतील यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही यंत्रणेतील सर्वात शेवटचा व महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत आहे. ग्रामीण भागात पक्ष विस्तार करण्यासाठी ही निवडणूक म्हणजेच राजकीय पक्षांसाठी नामी संधी आहे यासाठी प्रत्येक राजकीय पक्षातर्फे सुक्ष्म नियोजन केले जात आहे.

जिरवा जिरविचा चर्चा..
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली म्हणजे एकमेकांची जिरवणे हीच ईर्ष्या समोर ठेवली जाते यातून कुणाची अडवायची आणि कोणाची जिरवायची याचेही आडाखे बांधले जात आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या घडामोडींना तालुक्यात वेग आला असून कुणाचे पॅनल आणायचे आणि कुणाची विसर्जन करायचे याची फिल्डिंग कशी लावायची याच्या गाव गप्पा गावातील चौकाचौकात रंगत आहेत या निवडणुकीत विजयासाठी कोण अडचणीचा ठरणार तर कोणाची उमेदवारी फायदेशीर ठरणार असे अनेक अंदाज बांधले जात असताना आता त्याला फॉर्म भरू द्या नंतर माघार घ्यावी लागेल अशीही चर्चा आतापासूनच सुरू आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com