चार महिन्याच्या दुष्काळापेक्षा चार दिवसाच्या वादळाने जास्त रडवले!  

yeola
yeola

येवला : तब्बल चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण तालुक्याला मोठा हादरा दिला असून या वादळात जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे, भिंती, पॉलिहाऊस, पोल्ट्री, शाळा, कुल्फी कारखाना, झाडे, घरकुले, गोठे, द्राक्षबागा, शेतातील साहित्य व जनावरे अशा सर्वच घटकांना याचा तडाखा बसला आहे. यामुळे तब्बल पन्नास कोटीच्यावर नुकसान झाले असून चार महिन्याच्या दुष्काळापेक्षा चार दिवसाच्या वादळाने जास्त रडवल्याचे चित्र तालुक्यात आहे.प्रशासनाने निकषानुसार पंचनामे पूर्ण केले असून सुमारे दोन कोटी पर्यंतच्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्यात अद्याप पाणीटंचाई तसूभरही कमी झालेली नाही.मात्र चार दिवसाच्या वादळी पावसाने पावसाची इतकी चर्चा केली की जणूकाही येथे धो-धो पाऊस झाल्यासारखे चित्र दिसले. प्र

त्यक्षात पाऊस नावाला आणि वादळच अधिक अशी स्थिती या चारही दिवसात राहीली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्वच घटक यातून सुटू शकले नाही. विशेषतः धामोडे, कातरणी, राजापूर, रेंडाळे, डोंगरगाव, देवठाण, अनकाई, बदापूर, बाभुळगाव, मानोरी, पाटोदा, मुखेड, आडगाव चोथवा, नांदेसर, ममदापुर, खरवंडी, पिंपरी, खैरगव्हाण, देवदरी ही गावे परिसराला वादळाचा तडाखा बसला आहे.एकट्या ममदापूर गावात तर ५५ वर घरे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याने अनेक जण उघड्यावर आले आहेत. अद्याप पावसाचा हलकासाही फायदा झालेला नसताना नुकसानीने ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना अजूनच कर्जबाजारी करण्याची वेळ आली असल्याचेही चित्र ग्रामीण भागात दिसते.

या वादळाने सर्वाधिक झाडे पडली असून त्याखालोखाल घरांवरचे छताचे पत्रे उडाले,भिंती कोसळल्याने घरातील संपूर्ण साहित्य,अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय जनावरांचे गोठे,पॉलिहाऊस,पोल्ट्री फार्मचे पत्रे,भिंती मंदिरांचे व शाळांचे पत्रे,द्राक्षबागा,डाळींब बागा,सोलर पॅनल,कांदाचाळी आदि स्वरूपाचे नुकसान तालुक्यात झाले आहे.शहरातील पॅनसिया हॉस्पिटलवरील सौर ऊर्जेचा लाखो रुपये किमतीच्या सोलर पॅनल वादळात उडून गेला. कातरणी येथे विजय कुराडे व आडगाव चोथवा येथे श्यामराव खोकले या शेतकऱ्याचा शेततळ्याचा कागद उडून फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.येथील आठ ते दहा कांदा व्यापाऱ्यांचे शेडसह कांदा भिजून सुमारे दोन कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. दरम्यान,तलाठ्यांनी महसूल नियमानुसार नुकसानीचे पंचनामे केले असून त्याचा मदतीचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

सर्वाधिक झळ महावितरणला या वादळाने तालुक्यात सर्वाधिक झटका महावितरणला दिला आहे.शंभरावर पोल पडले,वाकले तसेच तारा तुटल्याने शहरासह ग्रामीण भागात २० ते ४० तासापर्यंत वीज पुरवठा खंडित होता. किंबहुना अजूनही गावोगावी दुरुस्तीचे काम सुरूच आहे.विशेष म्हणजे दुरुस्तीसाठी रोजच वीजपुरवठा खंडित केला जात असून यामुळे नागरिकांना अद्यापही खंडित विजेमुळे पाणीटंचाईसह घामाच्या धारा सोसण्याची वेळ येत आहे.

“तालुक्यात १०० वर घरांचे नुकसान झाले आहे. ममदापूरला तर ५० घरांचे नुकसान झाल्याने सर्वसामान्य परीस्थिती असलेले शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.शासनाने घरांचे नुकसान झालेल्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ देऊन निवारा उपलब्ध करावा.”
-दत्तात्रय वैद्य,माजी सरपंच,ममदापूर 

*घर पडून मृत्त्यू - १ 
*वीज पडून मृत्यू - २ बैल,१ शेळी,१ मेंढी 
*पडझड झालेल्या घरांची संख्या - ८३  
*नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या - १ 
*नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या - १४ 
*इतर खाजगी मालमत्तेच्या नुकसानीची संख्या -१३६ 
*सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान - ३ 
*एकूण मालमत्ताचे नुकसान - २५६ 
*मालमत्ता नुकसानीचे पंचनामा - १ कोटी ७४ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com